• Tue. Jun 9th, 2026

    पुण्याच्या प्राईम भागातील तब्बल २९ एकर जमीन, आधी एका शेतकऱ्याच्या नावावर अन् आता वनविभाग घेणार ताबा!

    पुण्याच्या प्राईम भागातील तब्बल २९ एकर जमीन, आधी एका शेतकऱ्याच्या नावावर अन् आता वनविभाग घेणार ताबा!

    Kondhwa News: पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथील २९ एकर वनजमीन हस्तांतरण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने हे हस्तांतरण बेकायदा ठरवले आहे. त्यानंतर आता वन विभागाने ही जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

    कोंढव्यातील वनजमीन महिनाभरात घेणार ताब्यात (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    पुणे: शहरातील कोंढवा बुद्रुक येथील २९ एकर वन जमिनीचे हस्तांतर सर्वोच्च न्यायालयाने बेकायदा ठरवल्यानंतर ही जमीन येत्या महिनाभरात ताब्यात घेण्याच्या हालचाली वन विभागाने सुरू केल्या आहेत. या जमिनीच्या सातबाऱ्यावर आपले नाव लावण्यासाठी वन विभागाकडून जिल्हा प्रशासनाला पत्र दिले जाणार आहे; तर जिल्हा प्रशासनाने या जमिनीच्या सद्यस्थितीचा अहवाल दोन दिवसांत सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना केल्या असून, त्यासाठी घटनास्थळाची पाहणी करण्यात येणार आहे.

    कोंढवा बुद्रुक येथील वन विभागाची सुमारे २९ एकर जमीन प्रथम एका शेतकऱ्याला व नंतर रिची रीच हौसिंग सोसायटीला देण्याचा वादग्रस्त निर्णय राज्य सरकारने १९९८ मध्ये घेतला होता. तत्कालीन महसूलमंत्री व तत्कालीन पुणे विभागीय आयुक्तांच्या या निर्णयामुळे वन संरक्षण कायद्याचे उल्लंघन होत असल्याची तक्रार करत नागरी चेतना मंचाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठाने वनजमिनीचे हस्तांतर बेकायदा ठरवून ही जमीन पुन्हा वन विभागाला देण्याचे आदेश दिले.

    ‘पुण्यासह राज्यातील सर्व वन जमिनींच्या हस्तांतरासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल महत्त्वाचा असून, ही जमीन पुन्हा वन विभागाकडे घेण्याची कार्यवाही केली जाणार आहे,’ असे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी सांगितले.

    सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नेमका काय?

    शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात सन १९९८मध्ये पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथील सुमारे २९ एकर राखीव वनजमीन नामांकित बांधकाम व्यावसायिकाला देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी बेकायदा ठरवला आहे. ‘राज्याचे तत्कालीन महसूलमंत्री व पुण्याच्या तत्कालीन विभागीय आयुक्तांनी जनतेच्या विश्वासाचा भंग करून मौल्यवान वनजमिनीचा खासगी व्यक्तींना बेकायदा लाभ दिला,’ असे कडक ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने ओढले असून वनजमीन म्हणून राखीव असलेल्या; परंतु महसूल विभागाच्या ताब्यात असलेल्या या जमिनीचा ताबा तीन महिन्यांच्या आत वन विभागाकडे देण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय. यापूर्वी लोकमत आणि न्यूज १८ लोकमत या संस्थांमध्येही कामाचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed