• Sun. Jun 7th, 2026

    मराठवाड्यात अवकाळीचा तडाखा; ‘या’ तालुक्यांत पिकांचं मोठे नुकसान, शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी

    मराठवाड्यात अवकाळीचा तडाखा; ‘या’ तालुक्यांत पिकांचं मोठे नुकसान, शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी

    Marathwada Unseasonal Rain: सिल्लोड शहरासह परिसरात शुक्रवारी दुपारी जोरदार अवकाळी पाऊस झाला. मेघगर्जनेसह एक तास झालेल्या या पावसाने शेतात पाणी साचले.

    sambhajinagar rain (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांत अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे शेतपिकांचे नुकसान झाले असून, मशागतीच्या कामांत खंड पडला आहे. सिल्लोड शहरासह परिसरात शुक्रवारी दुपारी जोरदार अवकाळी पाऊस झाला. मेघगर्जनेसह एक तास झालेल्या या पावसाने शेतात पाणी साचले.

    तालुक्यातील बोरगाव कासारी, गेवराई शेमी शिवारात वीज पडून एक गाय, एक बैल दगावला. अवकाळी पावसामुळे शेतीतील मशागतीची कामे थांबली आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून तालुक्यावर अवकाळीचे ढग आहेत. शुक्रवारी दुपारी पावसाने सिल्लोड, भवन, केहऱ्हाळा, पिंपळगाव पेठ, बोरगाव कासारी, गेवराई शेमी, निल्लोड, मंगरूळ, डोंगरगाव हा परिसर झोडपून काढला. या भागांत वादळी वाऱ्यासह एक तास पाऊस झाला. या पावसात कडाडणाऱ्या विजा मनात धडकी भरवणाऱ्या होत्या. बोरगाव कासारी शिवारातील गट नंबर २०२मध्ये वीज पडून गोरख उत्तम ब्राह्मणे यांची गाय दगावली. गेवराई शेमी शिवारात गट नंबर ५७३मध्ये वीज पडून उत्तम पंडित ताठे यांचा एक बैल दगावला. एक बैल भाजल्यामुळे जखमी झाल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली.
    मोठा दिलासा! भटके-विमुक्तांना आता राज्यात कुठेही मिळणार रेशन; जातप्रमाणपत्र, आधारसह १५ मागण्यांवर निर्णय
    अवकाळी पावसामुळे उन्हाळी, मका, बाजरी काढण्याच्या कामे थांबली आहेत. सध्या लग्नांची धामधूम सुरू असून, मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ होत आहेत. मात्र, अवकाळी पावसामुळे वहऱ्हाडी मंडळींची मोठी तारांबळ उडत आहे. सिल्लोड शहरातील अनेक भागांत पाणी साचल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली. सिल्लोड शहरातील वळण रस्त्याचे काम चालू असल्याने ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे अनेक नागरी भागांत पाणी साचले. याचा नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

    पावसामुळे बिजवाई कांद्याचे नुकसान
    खुलताबाद :
    गेल्या दोन-तीन दिवसांपासून तालुक्यात झालेल्या बिगरमोसमी पावसामुळे बिजवाई कांदापिकाचे मोठे नुकसान झाले. वादळी वाऱ्यांसह अचानक आलेल्या पावसामुळे बिजवाई कांद्याचे – पीक आडवे झाले. या नुकसानीचे पंचनामे करून, शेतकऱ्यांना भरपाई – द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
    Devendra Fadnavis: बालवाङ्मय वाचायचं माझं वय नाही! राऊतांच्या पुस्तकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा खोचक टोला
    वैजापूरमध्येही पावसाची हजेरी
    वैजापूर :
    वैजापूर शहर व परिसरात गुरुवारी दुपारनंतर अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या संध्याकाळी उशिरापर्यंत ढगाळ वातावरण होते व पावसाची रिमझिम सुरू होती. त्यामुळे उन्हाच्या काहिलीपासून नागरिकांची सुटका झाली. मात्र, पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. तालुक्यात सकाळपासूनच दमट वातावरण असल्याने प्रचंड उकाडा जाणवत होता. दुपारी अडीचच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी सहा वाजता पावसाची रिमझिम पुन्हा सुरू झाली.

    पावसाचा फुलंब्रीत तडाखा
    फुलंब्री :
    तापमानाचा पारा वाढत असतानाच तालुक्यातील काही भागांत गुरुवारी व शुक्रवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. पाऊस झालेल्या भागात उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळाला असला, तरी पाऊस थांबताच निर्माण झालेल्या दमट वातावरणामुळे उकाडा मात्र वाढला. पाऊस झालेल्या भागांत दाणादाण उडाल्याचे चित्र होते. तालुक्यातील शिरोडी, सोनारी, वावना, निधोना, आळंज व इतर परीसरात पावसाने हजेरी लावली. सोंगणीस आलेल्या बाजरी पिकाचे पावसामुळे मोठे नुकसान झाले. बिजवाई कांदा पिकाचेही नुकसान झाले. या पावसामुळे उन्हाळी मशागतीच्या कामालादेखील ब्रेक लागला आहे. दरम्यान, तालुक्यातील मुर्शिदाबादवाडी येथील निवृत्ती द्वारकानाथ विटेकर यांच्या बैलावर शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास वीज पडली. त्यामुळे बैलाचा मृत्यू झाला.
    पवार, ठाकरेंकडून मोदी-शहांना मदत; संजय राऊतांच्या पुस्तकात खळबळजनक दावा, आज प्रकाशन सोहळा
    नांदेड जिल्ह्यात अवकाळी पाऊस
    नांदेड :
    नांदेड शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत शुक्रवारी ठिकठिकाणी झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळित झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. गेल्या दोन दिवसांपासून नांदेड शहर व ग्रामीण भागांतील हवामानात बदल झाला आहे. हवामान खात्याने जिल्ह्यासाठी ‘यलो अॅलर्ट’ जारी केला होता. दिवसभर तापमान वाढलेले असताना सायंकाळी अचानक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांत पावसाच्या सरी बरसल्या. नायगाव बिलोली व नांदेड शहरातही वादळ वाऱ्यासह पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळित झाले. पावसामुळे अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. नांदेड शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *