Chandrashekhar Bawankule Slams Sanjay Raut : संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचं उद्या प्रकाशन होणार आहे. या पुस्तकात संजय राऊत यांनी अनेक राजकीय गौप्यस्फोट केल्याची चर्चा आहे. त्यामुळे या पुस्तकावरुन राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी या पुस्तकाच्या नावारुन संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
“संजय राऊतांनी स्वतःचं नैतिक दिवाळखोरीचं प्रदर्शन या पुस्तकात केलं आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी आपली राजकीय अधिपत्याची कहाणी मांडली आहे. मात्र ही एकतर्फी आणि भ्रामक मांडणी आहे”, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
“बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या विचारांवर आधारित शिवसेना उभी केली, आणि भाजप-शिवसेना युती ही सर्वोत्तम ठरली होती. मात्र, संजय राऊतांसारख्या व्यक्तीमुळेच शिवसेनेचा ऱ्हास झाला. त्यांनी काँग्रेससोबत युती करून हिंदुत्व विचारधारेपासून फारकत घेतली आणि उद्धव ठाकरे यांना काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं काम केलं”, अशी खोचक टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
‘अशा बाबी पुन्हा उकरून काढण्यामागे…’
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोर्टाने निर्दोष सोडलं आहे. तरीही या पुस्तकात काही वादग्रस्त गोष्टी मांडण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, अमित शाहा यांना 2010 मध्ये अटक झाली होती हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र कोर्टाने त्यांना निर्दोष घोषित केलं आहे. त्यामुळे अशा बाबी पुन्हा उकरून काढण्यामागे राजकीय हेतू आहे”, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
Sanjay Raut : ‘नरकातला राऊत’ असं पुस्तकाचं नाव ठेवा, चंद्रशेखर बावनकुळे यांचा खोचक सल्ला
‘देशाच्या न्यायव्यवस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न’, बावनकुळेंचा आरोप
“न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात पुस्तकात टीका असल्यास त्याची चौकशी झाली पाहिजे. पुस्तकात असलेली माहिती न्यायव्यवस्थेचा अपमान करणारी असल्यास संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या निकालावर आधारित विधानांमुळे देशाच्या न्यायव्यवस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आहे”, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. “पुस्तकावर बंदी घालण्याचा अधिकार आपल्याकडे नाही. मात्र पुस्तकाचा सखोल अभ्यास करून कायदेशीर पद्धतीने कारवाई करण्याची मागणी केली जाईल”, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.
