• Thu. Jun 18th, 2026

    मुंबईत तरुणीचा खून, मृतदेह बॅगेत भरून रेल्वे रुळावर टाकला; पोलिसांना एक धागा सापडला अन् गूढ उकलले!

    मुंबईत तरुणीचा खून, मृतदेह बॅगेत भरून रेल्वे रुळावर टाकला; पोलिसांना एक धागा सापडला अन् गूढ उकलले!

    Edited byअक्षय शितोळे | Contributed by अमूल जैन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 10 May 2025, 3:57 pm

    महिलेच्या मृतदेहाजवळ ओळख पठवण्यासाठीचा कोणताही ठोस पुरावा नव्हता, पण पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करत गुन्ह्याचा उलगडा केला आहे.

    पोलिसांनी केला खूनाचा उलगडा (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    रायगड, अमुलकुमार जैन: कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्जत-लोणावळा रेल्वे मार्गावर रुळाच्या बाजूला पडलेल्या सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. संबंधित महिलेच्या मृतदेहाप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद असताना गुन्हे प्रकटीकरण पथकाने कुर्ला टर्मिनस आणि बंगळुरू रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे एक पुरूष आणि एक महिला अशा दोन आरोपींना अटक केली आहे.

    लोकमान्य टिळक टर्मिनस येथून एक प्रवासी ट्रॉली बॅग घेऊन गाडीमध्ये चढला, मात्र बंगळूर येथे उतरताना त्याच्याकडे ट्रॉली बॅग नव्हती, या धाग्यावरून पोलिसांच्या विशेष पथकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने बंगळुरू येथून महिलेचा खून करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. सदर अविवाहित महिलेचा खून कशासाठी केला, त्या महिलेचा खून करताना आणखी कोणत्या व्यक्तीची मदत झाली आहे , याबाबतचा तपशील पोलिसांनी अद्याप दिलेला नाही. मात्र महिलेचा खून करून मृतदेह सुटकेसमध्ये टाकणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

    याबाबतची सविस्तर माहिती अशी की, १६ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्टेशन ठाकूरवाडी गाव हद्दीतील मुंबई-पुणे जाणाऱ्या डाऊन रेल्वे रुळाच्या शेजारी ट्रॉलीबॅगमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्याची घटना समोर आली होती. सदर घटनेविषयी पुणे लोहमार्ग महिला पोलीस हवालदार छाया दिलीप चव्हाण यांनी तक्रार दिल्याप्रमाणे कर्जत पोलीस ठाण्यात सदर अज्ञात मृत महिलेच्या खुनाविषयी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. अंगाने मजबूत, रंग गृहवर्णीय, केस काळे व लांब, उंची ५ फुट, मृत महिलेचे हात व पाय हिरव्या रंगाचे नायलॉन दोरीने बांधलेले, अंगात लाल रंगाचा गोल गळ्याचा टी-शर्ट तसेच पायात पाढऱ्या रंगाची व त्यावर पुलाची नक्षीकाम असलेली पॅन्ट, व मृत महिलेचा चेहरा व डोके काळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीमध्ये बांधल्याचे, गळ्याभोवती हिरव्या रंगाच्या नायलॉन दोरीने आवळलेले, तसेच कपाळपट्टीवर एका पाढऱ्या रंगाचे कपड्याने बांधल्याचे व डोळे व जीभ बाहेर अर्धवट आलेल्या हा मृतदेह आढळून आला होता. मात्र महिलेच्या मृतदेहाजवळ कोणताही ओळख पठवण्यासाठीचा ठोस पुरावा नव्हता.

    रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवतारे व कर्जत उप विभागीय पोलीस अधिकारी डी.डी टेळे यांनी अनोळखी महिलेच्या खूनाचा छडा व तिच्या अज्ञात मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी कर्जत पोलीस ठाणे व नेरळ पोलीस ठाणे येथील वेगवेगळे तपास पथके तयार केली होती. सदर माहिलेचा मृतदेह हा पुणे मार्गाकडे जाणाऱ्या रेल्वे रूळाशेजारी सापडल्याने या दोन्ही पोलीस ठाण्यातील तपास पथकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण, पनवेल, लोकमान्य टिळक टर्मिनस व कर्जत रेल्वे स्थानकावरील एकूण २०० ते २५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. लोकमान्य टिळक टर्मिनस या रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये मृतदेह सापडलेल्या वर्णनाप्रमाणे गुलाबी रंगाची ट्रॉली बॅग घेऊन जाणारा एक संशयीत इसम दिसून आला. त्यामुळे लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकातील फ्लॅटफार्म क्रमांक ४ वरील वेगवेगळे कॅमेरे वेगवेगळ्या अँगलने तपासले असता, सदर संशयीत इसम व महिला दि.१५ एप्रिल २०२५ रोजी रात्री २२.१७ वाजता मुंबई कोइंबतुर एक्सप्रेस नंबर ११०१३ या ट्रेनमधील कोच क्रमांक १०१४९६ ने बोगी क्रं. ए-१ एसी कोचमध्ये बसून गेल्याचे निष्पण झाल्या प्रमाणे रेल्वे प्रशासनाच्या रिझर्वेशन विभाग मुंबई यांच्याकडून त्या बोगीमधून प्रवास करणाऱ्या एकूण ५२ प्रवाशांची माहिती व रिझर्वेशन करीता दिलेला मोबाईल नंबर प्राप्त करत त्यांचे सीडीआर पोलिसांनी प्राप्त केले. दोन्ही संशयीत इसम बंगळुरू येथे उतरल्याचे सीडीआरवरून प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी बंगळुरू रेल्वे स्थानकातील दि. १६ एप्रिल २०२५ रोजीचे सदर ट्रेनचे रात्रीचे २०.५६ वाजताचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, संशयित इसम व महिला यांच्याकडे पिंक रंगाची ट्रॉली बॅगही दिसून न आल्यामुळे व अधिकचा संशय बळावल्याने दोन्ही तपास पथकाने मोबाईलच्या तांत्रिक पुराव्यांचा आधार घेत अत्यंत कौशल्याने सदर संशयीत महिला व पुरुष यांचे वास्तव्याचे पुरावे प्राप्त करून, दि. १६ मे २०२५ रोजी दोघांच्या बंगळुरू येथून मुसक्या आवळल्या आहेत.

    दरम्यान, धनलक्ष्मी एराप्पा रेड्डी ऊर्फ बिंदू वय ३४ वर्ष, रा. रापताडू, आंध्रप्रदेश असे मृत तरुणीचे नाव असून, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपी व्ही. विजयकुमार व्यंकटेश वय २६ वर्ष, रा. चित्तूर, आंध्रप्रदेश आणि टी. यशस्विनी राजा वय २४ वर्ष, रा. तिरुपती, आंध्रप्रदेश अशी आरोपींची नावे आहेत. सदर महिलेच्या खूनाची उकल करण्यासाठी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड, नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्यासह नेरळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप फड, पो.शि केकाण, पो.शि बेद्रे, पो.शि वांगणेकर, पो. शि वाघमारे, पो.शि दवणे, कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कीर्तीकुमार गायकवाड, पोहवा येरुंकर, पोहवा भोईर, पोलीस उपनिरीक्षक किरण नवले, पो. शि कारकूड यांनी अहोरात्र कष्ट घेवून या गुन्ह्यांची उकल केली आहे. या दोन्ही तपास पथकास रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवतारे यांच्या स्तरावरून उत्तम कामगिरीबद्दल २० हजार रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तर सदर गुन्ह्यांचा अधिकक तपास हा कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड हे करत आहेत, अशी माहिती कर्जत पोलीस ठाणे येथे अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवतारे यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय. यापूर्वी लोकमत आणि न्यूज १८ लोकमत या संस्थांमध्येही कामाचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed