Operation Sindoor Updates: मुंबई विमानतळावर एक संशयित ड्रोन दिसून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि एकच गोंधळ माजला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या ड्रोनचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
मुंबईच्या साकीनाका परिसरात एक अज्ञात ड्रोन उडताना दिसल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. ही घटना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावादरम्यान घडल्याने परिस्थितीचं गांभीर्य पाहता प्रशासनाने तातडीने पाऊले उचलली आहेत. साकीनाका पोलीस स्टेशनजवळ हजरत जय्यब जलाल (गैबन शाह दर्गा) मशीद आहे. तेथे एका खासगी सुरक्षा रक्षकाला संशयित ड्रोन दिसले. त्याने सांगितले की, ड्रोन काही वेळानंतर जवळच्या झोपडपट्टीमध्ये शिरले. या माहितीनंतर पोलिसांनी लगेच शोध मोहीम सुरू केली.
सहार एअरपोर्टने (Sahar Airport) मुंबई पोलीस कंट्रोल रूमला सकाळी ५ वाजता या घटनेची माहिती दिली. त्यानंतर साकीनाका पोलिसांना अलर्ट करण्यात आले. पोलिसांनी माहिती देणाऱ्या व्यक्तीशी बोलून त्याला ड्रोनचे फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास सांगितले. पोलिसांनी झोपडपट्टी परिसरात ड्रोन शोधण्यासाठी मोठी मोहीम चालवली आहे. ड्रोन दिसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. दोन पोलीस उपनिरीक्षक आपल्या टीमसोबत परिसरात या ड्रोनचा शोध घेत आहेत.
Mumbai News: पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर, मुंबई विमानतळाला बॉम्ब ब्लास्टची धमकी, फोनवर म्हणाला….
मात्र, पोलिसांना तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही. साकीनाका परिसरातील काही लोकांनी ड्रोनसारखी वस्तू पाहिल्याची माहिती पोलिसांना दिली. मात्र, पोलिसांनी शोध घेतला असता, त्यांना काहीही सापडले नाही. साकीनाका एअरपोर्टजवळ असल्याने तो भाग खूपच संवेदनशील मानला जातो. या भागात नेहमी पोलीस आणि CISFचे जवान तैनात असतात. त्यांनी देखील ड्रोन पाहिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. तरीही, मुंबई पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
मुंबईच्या समुद्रकिनारीही सुरक्षा वाढवली
मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुंबई पोलीस आणि इंडियन कोस्ट गार्ड यांनी मिळून समुद्रकिनारे, बंदरे, गोदी आणि समुद्राच्या मार्गांवर गस्त वाढवली आहे. संवेदनशील भागांमध्ये CCTV कॅमेऱ्यांच्या मदतीने लक्ष ठेवले जात आहे. तसेच, ड्रोनच्या साहाय्याने देखील नजर ठेवण्यात येत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्यामुळे मुंबई पोलिसांनी ‘सागर कवच’ नावाचे मोठे तटरक्षक अभियान सुरू केले आहे.
या अभियानांतर्गत समुद्रात गस्त वाढवण्यात आली आहे. मच्छीमारांना सतर्क राहण्यास आणि बोटींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. कोणतीही व्यक्ती समुद्राच्या मार्गाने शहरात प्रवेश करणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. यासाठी मच्छीमारांच्या बोटींच्या ये-जा करण्याच्या मार्गांवर बारीक नजर ठेवण्यात येत आहे. समुद्रातील संरक्षण विभाग क्षेत्रात मासेमारी न करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. त्याशिवाय, ऑफशोर डिफेन्स एरियामध्ये शूट टू किल म्हणजेच दिसताक्षणीच गोळी झाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे सर्व उपाय सुरक्षेच्या कारणास्तव केले जात आहेत.
Mumbai News: ऑपरेशन सिंदूरनंतर मुंबई विमानतळ परिसरात संशियत ड्रोन, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, परिसरात खळबळ
२६/११ च्या हल्ल्यात दहशतवादी हे समुद्राच्या मार्गानेच मुंबईत आले होते. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचालींबद्दल त्वरित पोलीस किंवा सुरक्षा एजन्सीला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे म्हटले आहे.

