Santosh Jagdale Wife on Operation Sindoor : मोदी सरांनी ऑपरेशन सिंदूर नाव घेऊन दहशतवाद्यांच्या तळांवर, मदरशांवर, नऊ ठिकाणांवर हल्ला केला, तो योग्यच आहे. त्यांना धडा शिकवायलाच पाहिजे, अशा भावना संतोष जगदाळे यांच्या पत्नीने व्यक्त केल्या.
जगदाळे कुटुंबाची प्रतिक्रिया काय?
संतोष जगदाळे यांची पत्नी प्रगती जगदाळे म्हणाल्या की, मोदी सरांनी ऑपरेशन सिंदूर केलं, त्यातून पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 26 जणांना श्रद्धांजलीच वाहिली आहे. ऑपरेशन सिंदूर या नावासाठी मी त्यांची आभारी आहे. हे नाव ऐकताच माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी आमच्या भावना जाणून घेतल्या. आमचं कुंकू दहशतवाद्यांनी आमच्या समोर पुसलं, धडाधड गोळ्या घालून त्यांनी माझ्या नवऱ्याला धारातीर्थी पाडलं, माझ्या मिस्टरांनी कोणत्याही धर्माचं नाव घेतलं नव्हतं, याचा मला अभिमान वाटतो. आज मोदी सरांनी ऑपरेशन सिंदूर नाव घेऊन दहशतवाद्यांच्या तळांवर, मदरशांवर, नऊ ठिकाणांवर हल्ला केला, तो योग्यच आहे. त्यांना धडा शिकवायलाच पाहिजे, अशा भावना संतोष जगदाळे यांच्या पत्नीने व्यक्त केल्या.
Operation Sindoor: भरलेले डोळे, जोडलेले हात; शुभमच्या पत्नीने मानले मोदींचे आभार, म्हणाली – आज त्याला शांती मिळाली असेल
आम्ही मोदींच्या लेकी
“मला कसलीही धाकधूक नव्हती, आम्ही मोदींच्या मुली आहोत, आम्ही जेव्हा आमचे मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवले, तेव्हा मला एकच खात्री होती, की आमच्या वडिलांपर्यंत मेसेज पोहोचला, ते दहशतवाद्यांवर हल्ला करणार याची खात्री होती. उरी प्रकरणानंतरही त्यांनी त्या लोकांना दाखवून दिलं होतं, की आम्ही करु शकतो, त्यामुळे मला खात्री होती, की ते यावेळीही काहीतरी करणार, थोडा वेळ लागणार आणि करणारच..” असंही प्रगती जगदाळे म्हणाल्या.
Pragati Jagdale : आम्ही मोदींच्या लेकी, वडिलांनी न्याय मिळवून दिला; डोळ्यादेखत कुंकू पुसलं गेलं, ऑपरेशन सिंदूर नाव ऐकताच रडू कोसळलं, प्रगती जगदाळेंच्या भावना
भारतीय असल्याचा अभिमान
दरम्यान, संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी जगदाळे म्हणाली, की माझ्या वडिलांना खऱ्या अर्थाने सरकारकडून श्रद्धांजली मिळाली आहे. माझ्या वडिलांचं बलिदान वाया गेलं नाही, सरकारने 15 दिवसात मिशन पूर्ण केलं, याचं चांगलं वाटतंय, सरकारचे आभार. 22 तारखेच्या काळ्या दिवशी वीरमरण आलेल्या सर्वांचा सूड म्हणून जे केलंय, त्यामुळे भारतीय नागरिक असल्याचा अभिमान वाटतो. मॉक ड्रीलनंतर भीती वाटत होती, अंधार होता, काय आहे माहिती नव्हतं, 1971 नंतर कधी झालं नव्हतं, आज सकाळी मामाचा फोन आला तेव्हा समजलं की, असे एअरस्ट्राईक झाले आहेत, असं आसावरी जगदाळे म्हणाली.
Operation Sindoor : कुंकवाचा करंडा अन् शौर्याचं प्रतीक, पहलगाम हल्ल्याचा सूड, ‘ऑपरेशन सिंदूर’ नावामागे कारण काय?
तर पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कौस्तुभ गणबोटे यांच्या मुलाने प्रतिक्रिया देताना म्हटले, की दहशतवाद्यांना धडा मिळाला की भारताकडे वाकडी नजर करुन पाहता कामा नये. ऑपरेशन सिंदूरमुळे सर्व महिलांना सन्मान मिळाला, कारण त्यांनी आपल्या डोळ्यासमोर क्रूरपणे आपल्या कुटुंबातील कर्ते पुरुष मृत्युमुखी पडताना पाहिले.

