• Sat. Jun 13th, 2026

    Raj-Uddhav Thackeray : पडद्यामागे हालचाली वाढल्या, राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार? बाळा नांदगावकर म्हणाले…

    Raj-Uddhav Thackeray : पडद्यामागे हालचाली वाढल्या, राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार? बाळा नांदगावकर म्हणाले…

    Bala Nandgaonkar : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी यावर आज प्रतिक्रिया दिली आहे.

    प्रातिनिधिक फोटो (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : आगामी काळात मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचं तगडं आव्हान असणार आहे. असं असलं तरी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाची मुंबईत चांगली ताकद आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी ते दाखवून दिलं आहे. या निवडणुकांनी मुंबईत असणारं ठाकरे नावाचं वलय दाखवून दिलं आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे नावाची जादू आपल्यासोबत असावी म्हणून भाजप आणि शिंदे गटाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आपल्यासोबत महायुतीत समाविष्ट करुन घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण अचानक दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

    राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत महाराष्ट्रासाठी आपण सर्व भांडण बाजूला सारुन उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्यास तयार असल्याचं म्हटलं. त्यांच्या या वक्तव्याला उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच ठाकरे गटाकडून राज ठाकरे यांना एकत्र येण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केला जात आहे. पण दरम्यानच्या काळात दोन्ही ठाकरे बंधू हे परदेशात फिरायला गेले. राज ठाकरे हे दोन दिवसांपूर्वी मुंबईत परतले. तर उद्धव ठाकरे अद्याप आलेले नाहीत. ते लवकरच मुंबईत येणार आहेत. त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतात का? ते आगामी काळात स्पष्ट होईल. पण त्याआधी मनसे नेते बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

    बाळा नांदगावकर काय म्हणाले?

    “दोन बंधूंमध्ये काय चर्चा चाली आहे ते त्यांना माहिती. त्यांच्यात चर्चा चालू आहे की नाही त्याबाबत माहिती नाही. त्यामुळे त्यावर आता भाष्य करणं ही काही उचित ठरणार नाही. कारण वरिष्ठ बोलत असताना कनिष्ठांनी बोलू नये एवढं संकेत मला माहिती आहे. त्यामुळे मी कनिष्ठ माणूस आहे. कनिष्ठ असल्यामुळे वरिष्ठ नेते भेटतील आणि बोलतील. संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्या वतीने वरिष्ठ म्हणून आले आहेत. आमच्या बाजूने आम्ही कनिष्ठ आहोत”, असं म्हणत बाळा नांदगावकर यांनी राऊतांना टोला लगावला.

    विनायक राऊत यांचं सूचक वक्तव्य

    ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही जनतेची इच्छा आहे, असं ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत म्हणाले आहेत. उद्धव आणि राज ठाकरे परदेशात गेले हा योगायोग आहे, असंही ते म्हणाले. “सध्याची खुनसी राजवट आणि महाराष्ट्राला लुबाळत पाहणाऱ्यांची राजवट उलथून टाकायची असेल तर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे. ती नाकारता येत नाही”, असंही विनायक राऊत म्हणाले आहेत.

    मनसेकडून मुंबई महापालिकेची जय्यत तयारी

    दरम्यान, मनसेकडून आता मुंबई महाालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. मुंबईतील 227 प्रभागांमधील गटाध्यक्षांच्या बैठकांचा सपाटा सुरु आहे. 20 जुलैपर्यंत प्रत्येक रविवारी प्रत्येक महापालिका प्रभागांमध्ये बैठका होणार आहेत. बाळा नांदगावकर यांनीदेखील याबाबत आज माहिती दिली. “मुंबई महापालिकेत एकूण 227 प्रभाग आहेत. या मतदारसंघांमध्ये आमचे गटाध्यक्ष किती ताकदीचे आहेत, किती आहेत, याचा लेखाजोखा घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. तो लेखाजोखा घेण्यासाठी हा संवाद मेळावा आहे. सकाळी अकरा वाजता बोरिवली या ठिकाणी बैठक झाली”, अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकर यांनी दिली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed