• Sat. Mar 7th, 2026
    ‘मु्स्लीम ओरडून सांगतात की आम्ही सरकारबरोबर, तरी…’ पहलगाम हल्ल्यानंतर अबू आझमींची सरकारसमोर खदखद

    Abu Azmi Reacted on Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर आता सपा नेते अबू आझमी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी मोठे विधान करत दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाईचीही मागणी केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यात २६ जण मृत्यूमुखी पडले आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी हिंदू धर्माचे का? असे विचारुन गोळ्या झाडल्या. त्यानंतर देशवासीयांमध्ये अनेक मतमतांतरे पाहायला मिळत आहेत. यावर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यावर आता सपा नेते अबू आझमी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या, कारण त्यांना माहीत होतं की असं केलं तर भारतामध्ये हिंदू -मुस्लीम वाद होईल,’ असं मोठं विधान त्यांनी केलं आहे. तसेच दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

    अबु आझमी म्हणाले, दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या, कारण त्यांना हे चांगलं माहीत होतं की, असं केलं तर भारतामध्ये हिंदू -मुस्लीम होईल. पण ज्याठिकाणी हल्ला झाला तेथील मुस्लीम बांधव बचावासाठी धावून आले. मात्र भारतातील लोकांकडून मुसलमान बांधवांना अशी वागणूक का दिली जाते?
    पहलगाम हल्ल्यानंतर महाराष्ट्र सरकारचा राज्याच्या पर्यटकांसाठी मोठा निर्णय
    आझमी असेही म्हणाले की, काश्मीरच्या पहलगाममध्ये जे घडलं त्यावर सगळेच मुस्लीम ओरडून सांगत आहेत, आम्ही सरकार बरोबर आहोत. तर सरकारने या दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणीही मुस्लीम बांधव करत आहेत. ‘आता ज्यांनी हिंदूंना मारले त्यांना तुम्ही मारा, आम्हाला का त्रास देत आहात?’ अशी संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

    आझमींनी पुढे भाजप आमदार नितेश राणेंवरही निशाणा साधला आहे. ‘मुंबईतील दादरसह देशभरात मुस्लीम लोकांना मारहाण करण्यात आली. यात सगळ्यात मोठी बाब म्हणजे निवडून आलेले सत्ताधारी आमदारसुद्धा मुस्लीमांविरोधात वक्तव्य करतात. संविधानाची शपथ घेऊन नितेश राणे रत्नागिरीत जाऊन हनुमान चालीसा वाचायला सांगत आहेत, हिंदू-मुस्लीम करत आहेत. मी पंतप्रधान, सरकार, मोहन भागवत यांच्यासह सर्वांना विनंती करतो की, जातीयवाद होऊ देऊ नका. यासंदर्भात आता एक पत्रक काढून आदेश देण्याची गरज आहे.’ असे म्हणत आझमींनी कारवाईची मागणी केली.

    सरकार मुस्लिम विरोधात सगळ्या गोष्टी करत असल्याचा मुद्दाही आझमींनी अधोरेखित केला आहे. ते म्हणाले, सरकार ज्या गोष्टी आणत आहेत, त्या सगळ्या मुस्लिम विरोधात आहेत. वक्फ बोर्ड कायदा तोही मुसलमान विरोधात आहे, तो आम्हाला नको आहे. ‘सगळे हिंदू-मुस्लिम यांना लढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,’ असा आरोपही त्यांनी केला.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *