• Fri. Mar 13th, 2026
    अजित पवारांनी घेतली मुलाखत, सोबतीला शरद पवारांच्या पक्षासह शेतकरी संघटनेचे नेते; इंदापूरमध्ये वेगळ्या राजकारणाची नांदी

    NCP Sharad Pawar And Ajit Pawar Together : इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखाना आर्थिक दृष्ट्या अडचणीत आला आहे. सगळ्याच पक्षाचे नेते एकत्र येऊन नवी मोट बांधत आहेत. यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह शेतकरी कृती समितीचे प्रमुख पृथ्वीराज जाचक यांनी कारखान्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी शरद पवारही उपस्थित होते.

    (फोटो– Lipi)

    दीपक पडकर, बारामती : इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखाना आर्थिक दृष्ट्या अडचणीत आला आहे. या कारखान्याला सावरण्यासाठी सर्वच स्तरातील ऊस उत्पादकांची तळमळ आहे आणि तेच सध्या छत्रपती कारखान्याच्या परिसरात विरोधक सत्ताधारी आणि सगळ्याच पक्षाचे नेते एकत्र येऊन नवी मोट बांधत आहेत, त्यावरून दिसून येत आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह शेतकरी कृती समितीचे प्रमुख पृथ्वीराज जाचक यांनी कारखान्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.

    या मुलाखती एवढ्या इंटरेस्टिंग होत्या, की या मुलाखतीसाठी चक्क राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (Sharad Pawar) तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष त्याचबरोबर विविध राजकीय पक्ष व स्थानिक संघटनांचे नेतेमंडळी देखील हजर होती. सन १९९२ पासून हा कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्यात विचारांच्या कार्यकर्त्यांच्या ताब्यात राहिला. गेल्या पंधरा वर्षांपासून मात्र कारखान्याची वाताहात झाली आहे. गेल्या दहा वर्षांत तर केवळ अजित पवारांनाच मानणारे कार्यकर्ते या संचालक मंडळात आहेत. मात्र या कारखान्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात काही दिवसापर्यंत नाराजीची तीव्र लाट होती.

    या परिस्थितीचा विचार करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधक असलेल्या शेतकरी कृती समितीचे प्रमुख पृथ्वीराज जाचक यांच्याशी संधान साधले. एवढेच नाही तर अचानक जाचक यांनी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय शेतकऱ्यांच्या मेळाव्याला स्वतः अजित पवार उपस्थित राहिले आणि त्यांनी आपल्याच संचालकांची कानउघडणी केली. या संचालकांनी अत्यंत घाणेरडे काम केले असल्याबद्दल स्पष्ट शब्दात जाहीरपणे नाराजी देखील व्यक्त केली आणि त्याचवेळी अजित पवारांनी पुढील पाच वर्ष जाचक यांच्याकडेच कारखान्याचे नेतृत्व राहील, असे जाहीरपणे सांगून टाकले.

    यानंतर मात्र कारखान्याच्या परिसरातील राजकारणाची दिशाच बदलून गेली. एका अर्थाने अजित पवारांनी एका दगडात अनेक पक्षी मारले. बारामती व इंदापूर तालुक्यावर अजित पवारांना त्यांची पकड निर्माण करायची आहे, मात्र याला अडसर ठरत आहेत, ते छत्रपती कारखाना आणि माळेगाव कारखान्याच्या परिसरातील राजकीय परिस्थिती. या राजकीय परिस्थितीचा फायदा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने देखील उचलण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी विरोधकांची मोट बांधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या सगळ्या परिस्थितीला पुन्हा कवेत आणण्यासाठी अजित पवार यांनी कंबर कसली आणि बाजी पलटवली.

    याच पार्श्वभूमीवर आज २४ एप्रिलला कारखान्यासाठी अर्ज भरलेल्या ४३० उमेदवारांची मुलाखत अजित पवार आणि दत्तात्रय भरणे यांनी घेतली. यावेळी बारामतीतील भिगवन रस्त्यावरील इम्पेरियल हॉलमध्ये मोठ्या संख्येने ऊस उत्पादक असलेले छत्रपती कारखान्याचे सभासद व राजकीय नेते मंडळींची गर्दी झाली होती. याच गर्दीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील होते त्याचबरोबर राजू शेट्टी यांनी देखील या पॅनलला पाठिंबा दिला आहे.

    अजूनही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी यामध्ये खोडा घातला आहे. अजित पवार महायुतीत असले तरी देखील भारतीय जनता पक्ष व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आणखी एका पॅनलची निर्मिती सुरू केली आहे. हा पॅनल झाला तर बिनविरोध होऊ शकेल, असे अंदाज बांधलेली ही निवडणूक दोन किंवा तीन पॅनलच्या आधारे लढली जाऊ शकते. यंदा छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मात्र पृथ्वीराज जाचक यांनाच नेतृत्व द्या, तरच कारखाना या परिस्थितीतून बाहेर येईल, अशी सभासदांची सार्वत्रिक मागणी असल्याने पृथ्वीराज वाचक यांच्याभोवती या कारखान्याची राजकारणाची सगळी चक्रे फिरत आहेत.

    अर्थात अजित पवारांना हा कारखाना चांगला चालावा, असे वाटत असेल तर ते जाचक यांना पूर्ण नेतृत्वाची संधी देतील, कारण यापूर्वी अनेकदा अध्यक्ष राहिलेल्या पदाधिकाऱ्यांना कुरघोड्यांच्या राजकारणाला सामोरे जावे लागले होते. त्या पार्श्वभूमीवर खरोखरच कारखाना बाहेर काढायचा असेल तर या पाच वर्षात कुठेही राजकीय हस्तक्षेप झाला नाही पाहिजे, अशी ही चर्चा या ठिकाणी ऐकायला मिळत होती.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *