Eknath Shinde Meets Raj Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणातील आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नरगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतं. गेल्या साडेतीन वर्षांच्या घडामोडींनी तर याच गोष्टी दाखवून दिल्या आहेत. कोणता पक्ष किंवा नेता कुणासोबत मैत्री करणार? याचा काहीच भरोसा राहिलेला नाही. कारण विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या पराभवामुळे एकनाथ शिंदे आणि मनसेचे संबंध ताणले गेले होते. मनसेकडून अमित ठाकरे माहीम येथून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. पण याच मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी उमेदवारी मागे घेतली नव्हती. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे यांच्यातील संबंध ताणले गेले होते. या वादानंतर पहिल्यादांच एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी आले आहेत. त्यामुळे ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
एकनाथ शिंदे ‘शिवतीर्थ’ येथे दाखल होण्याआधी त्यांचे विश्वासू नेते मंत्री उदय सामंत हे राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर दाखल झाले. त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा माध्यमांनी प्रयत्न केला. यावेळी उदय सामंत यांनी आपल्याला या भेटीबाबत जास्त माहिती नाही, असं सांगितलं. “मी वेगळ्या कार्यक्रमात होतो. मला अचानक फोन आला की, एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी येत आहेत. त्यामुळे मलाही बोलवण्यात आलं. दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा होईल हे तेच नेते सांगतील. नेमकी भेट कशासाठी आहे ते मला माहिती नाही”, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी माध्यमांना दिली आहे.
भेटीमागील राजकारण काय?
आगामी काळात राज्यात महापालिका निवडणुका आहेत. विशेष म्हणजे मुंबई महापालिका निवडणूक आहेत. मुंबई आणि ठाकरे कुटुंबाचं एक वेगळं नातं आहे. त्यामुळे आपल्यासोबत ठाकरे असावेत, असं राजकीय पक्षांना वाटणं साहजिकच आहे. एकीकडे शिंदेंना एकटं पाडण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून भाजपसोबत हातमिळवणी केली जाते की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तसेच महायुती सरकारमध्ये सातत्याने शिंदे यांची नाराजी समोर येत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे वेगळं राजकीय समीकरण तयार करण्याच्या प्रयत्नात तर नाहीत ना? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. अर्थात तसं घडलं तर एकनाथ शिंदे यांच्यासह राज ठाकरे यांच्या पक्षालाही त्याचा फायदा होऊ शकतो. असं असलं तरीही दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होते? ते पाहणं महत्त्वाचं आहे.