• Wed. Apr 23rd, 2025 1:07:13 AM
    “औरंगजेब अखंड भारताचा निर्माता, चीनला लाथाडून कैलास पर्वत भारतात आणला” एमडीपीचा जावई शोध

    Authored byआशिष मोरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 20 Mar 2025, 9:40 am

    Nagpur Violence News : मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर यांनी या सगळ्या प्रकरणात आपल्या पक्षाचा हात नसल्याचा दावा करत, औरंगजेब अखंड भारताचा निर्माता असल्याचा जावई शोध लावला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    नागपूर : नागपूर हिंसाचाराचा म्होरक्या आणि मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष फहीम खानला काल(१९ मार्च) अटक झाली. ३८ वर्षीय फहीमवर जाणूनबून दंगल भडकवल्याचा आरोप आहे. फहीमने केलेल्या प्रक्षोभक भाषणामुळे हिंसाचार उफाळला. दरम्यान, या सगळ्या गदारोळात आता मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर यांनी या सगळ्या प्रकरणात आपल्या पक्षाचा हात नसल्याचा दावा करत, औरंगजेब अखंड भारताचा निर्माता असल्याचा जावई शोध लावला आहे.

    औरंगजेबाच्या कबरीवरुन पेटलेल्या वादामुळे नागपुरात सोमवारी(१७ मार्च) हिंसाचार घडला. या दंगलीचा मास्टरमाईंड फहीम खान याच्या चिथावणीखोर भाषणामुळेच समुदाय संतापला आणि दंगल घडली, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली. त्यानुसार ३८ वर्षीय फहीमला अटक करण्यात आली. फहीम खान मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पक्षाचा (एमडीपी) शहराध्यक्ष आहे. या पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर यांनी नागपुरात झालेल्या हिंसेशी आपल्या पक्षाचा आणि पक्षाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याचा संबंध नसल्याचा दावा करत फईम खानचा बचाव केला आहे. इतकेच नाही तर भारतातल्या अनेक चांगल्या कामांचा आणि अखंड भारताचा औरंगजेब जनक होता असा दावाही केला.

    हमीद म्हणाले की, औरंगजेबाशी आमचा काहीही संबंध नाही. परंतु तो एक मुघल बादशहा होता ज्याने, अखंड भारताची निर्मिती केली. त्याने चीनला लाथाडून हिंदुंचा कैलास पर्वत भारतात आणला. औरंगजेबने जर संभाजी महाराजांची हत्या केली असती, तर त्याने शाहू महाराजांचे पालनपोषण का केलं असतं? असा सवालही त्यांनी विचारला. संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज महाराष्ट्राची शान आहेत त्यांची जो कोणी बदनामी करेल तो देशविघातक काम करत आहे. आम्ही औरंगजेबच्या चांगल्या कामांचे समर्थन करतो. त्याच्या चुकीच्या कामाशी आमचं देणंघेणं नाही. असेही ते म्हणाले.

    पत्रकारांशी बोलतान एमडीपी चे कार्याध्यक्ष हमीद म्हणाले की, फहीमचा या हिंसाचाराशी काहीही संबंध नाही. विंहींपकडून औरंगजेबाची जी प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली, त्यावर असलेल्या कापडावर आमच्या धार्मिक आस्थेविषयीचे लिखाण होते आणि तेही जाळण्यात आले, ज्याला आम्ही विरोध केला. ते पुढे असेही म्हणाले की, आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याने औरंगजेबच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या नाहीत. उलट जनतेमधून आलेल्यांपैकी कोणीतरी घोषणा दिली. आम्ही तर केवळ सात ते आठ लोकच पोलिस स्टेशनमध्ये गेलो होतो. दरम्यान, फहीम खान दोषी नाही, आमचा त्याच्यावर पूर्ण भरवसा आहे. जर तो दोषी निघाला तर आम्ही त्याला पक्षातून काढून टाकू. असेही ते म्हणाले.

    आशिष मोरे

    लेखकाबद्दलआशिष मोरेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि मानसशास्त्र बातम्यांमध्ये आवड. सायकॉलॉजी मध्ये विशेष अध्ययन.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed