Yogesh Kadam on Nagpur Violence : सोमवारी रात्री साडेबारा-दीड वाजताच्या सुमारास पोलीस प्रशासनाने नागपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. नागपूरच्या काही झोनमध्ये कलम १४४ (कर्फ्यू) आपण लावला आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.
योगेश कदम काय म्हणाले?
सोमवारी रात्री साडेबारा-दीड वाजताच्या सुमारास पोलीस प्रशासनाने नागपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. नागपूरच्या काही झोनमध्ये कलम १४४ (कर्फ्यू) आपण लावला आहे. काही ठिकाणी गाड्यांचं, दुकानांचं, घरांचं नुकसान झालं आहे. लोक काही घरांमध्ये घुसले होते. अशा गंभीर बाबतीत कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत, अशी माहिती योगेश कदम यांनी दिली.
भाजप आमदार प्रवीण दटके यांनी केलेल्या दाव्याबद्दल माहिती घेतली आहे. त्यांचं म्हणणं आहे की रात्री दहा वाजता नागरिकांकडून स्थानिक पीआयना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात होता, पण तो झाला नाही. याचं कारण समोर आलं नाही, पण या घटनेची चौकशी केली जाईल. दोषींवर कारवाई केली जाईल, असं आश्वासन योगेश कदम यांनी दिलं.
Nagpur News: कबरीचा वाद, नागपुरात हिंसाचार; जमावाचा पोलिसांवर वार, DCP निकेतन कदम गंभीर जखमी
सकाळच्या वेळी एक आंदोलन झालं, कुठलाही वादविवाद न होता दुपारी काही जण पोलीस स्थानकात जमा झाले होते, त्यांचं पोलीस आयुक्तांशी बोलणं झालं, वाद तेव्हाच मिटला होता. दुपारी चार-पाच तासांनंतर काही जणांनी प्लॅनिंग केलं असावं, असा अंदाज आहे, मात्र खात्रीशीररित्या सांगता येणार नाही. घर आणि गाड्यांवर हल्ले करण्यात आले, याचं कुठून आणि कोणी प्लॅनिंग केलं, याची चौकशी करण्यात येईल, असंही कदम म्हणाले.
Nagpur Violence: पोलीस नेहमीच्या ठिकाणी का नव्हते? नागपूर राड्यावरुन भाजप आमदाराचा संताप
हिंसाचाराचं कारण स्पष्ट झालेलं नाही, मात्र ४७ जण ताब्यात घेण्यात आले आहेत. १२-१४ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तर २-३ सामान्य नागरिक जखमी आहेत. या घटनेचं मूळ कारण शोधून काढणार, असं योगेश कदम यांनी स्पष्ट केलं.

