• Mon. Mar 9th, 2026
    तो सेल्फी ठरला अखेरचा! बदलापूरला मित्रांसोबत रुळावर फोटो काढत होता, मागून ट्रेन आली अन्…

    Thane Youth Died In Train Accident: नातेवाईक आणि मित्रांसोबत रेल्वे रुळावर सेल्फी काढायला गेलेल्या एका तरुणाचा भरधाव एक्स्प्रेसच्या धडकेत मृत्यू झाला आहे. या घटनेने पुन्हा एकदा नागरिकांचा निष्काळजीपणा समोर आला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    ठाणे: नातेवाईक आणि मित्रांसोबत रेल्वे रुळावर सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा भरधाव ट्रेनच्या धडकेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यात घडली आहे. अंबरनाथ-बदलापूर दरम्यान उड्डाणपुलाखाली रेल्वे रुळावर सेल्फी घेत असताना या २४ वर्षीय तरुणाला लांब पल्ल्याच्या ट्रेनने धडक दिल्याने दुद्रैवी मृत्यू झाला आहे, पोलिसांनी गुरुवारी (६ फेब्रुवारी) याबाबतची माहिती दिली. या घटनेने परिसरात एकट खळबळ माजली आहे.

    ही घटना मंगळवारी (४ फेब्रुवारी) घडल्याची माहिती आहे. दोन दिवसांपूर्वी मंगळवारी संध्याकाळी अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकांदरम्यान उड्डाणपुलाखाली ही घटना घडली असल्याची माहिती कल्याण येथील रेल्वे पोलीस (जीआरपी) अधिकाऱ्याने दिली.

    जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरी कांदे यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितलं की, या घटनेत साहिर अली नावाच्या २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. साहिर अली हा मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी होता. तो मंगळवारी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ परिसरात नातेवाईकांना भेटायला आला होता. त्यावेळी ही धक्कादायक घटना घडली.

    साहिर हा मंगळवारी आपल्या नातेवाईक आणि मित्रांसह अंबरनाथ-बदलापूर दरम्यान असलेल्या उड्डाणपुलाखालील रेल्वे रुळाजवळ गेला होता. तिथे सेल्फी आणि ग्रुप फोटो काढण्यासाठी हे लोक गेले असल्याची माहिती आहे. मात्र, यावेळी सेल्फी काढण्याच्या नादात मागून भरधाव वेगात कोयना एक्स्प्रेस येत आहे हे त्याच्या लक्षातच आलं नाही. वेळीच रेल्वे रुळावरुन बाजूला होत न आल्याने भरधाव कोयना एक्स्प्रेसने साहिरला धडक दिली आणि त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. ट्रेनने हॉर्न वाजवला, तिथल्या लोकांनीही त्याला आवाज दिला, पण त्याने लक्ष दिलं नाही, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

    या घटनेची माहिती मिळताच जीआरपी जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी साहिरचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

    रेल्वे पोलीस आणि प्रशासनाकडून वारंवार सूचना केल्या जातात की रेल्वे रुळाजवळ जाऊ नका, रेल्वे रुळ ओलांडू नका, पुलाचा वापर करा, पण तरीही नागरिक अशा प्रकारे आपला जीव धोक्यात घालतात आणि त्यातून अशा भीषण घटना घडत असतात. त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचं या घटनांवरुन दिसून येते

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed