Nitesh Rane BJP : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप रत्नागिरी जिल्ह्यात भाजप संघटनात्मक बदल करताना दिसत आहे. यातच पक्ष संघटना बळकट करण्यासाठी भाजपचे युवा नेते मंत्री नितेश राणे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या खांद्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांना रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री करण्यात आले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पक्षसंघटनेच्या बळकटीसाठी भाजप पाऊल टाकत असल्याचे यातून दिसत आहे.
भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राष्ट्रीय सदस्यता अभियान अंतर्गत आज ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठाच्या पाटकर सभागृह, मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सह-संघटन मंत्री शिव प्रकाश, राष्ट्रीय सचिव आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर तसेच पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी राज्यातील भाजपच्या संपर्क मंत्र्यांची घोषणा करण्यात आली. ज्या जिल्ह्यात भाजपाचा आमदार किंवा मंत्री नाही त्या जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून भाजपने आपल्या पक्षाच्या मंत्र्यांवर त्या जिल्ह्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यानुसार राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून पक्षाने जबाबदारी सोपवली आहे.
मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास खात्याचे मंत्रिपद स्वीकारल्यानंतर प्रथमच रत्नागिरीत आलेल्या नितेश राणे यांनी रत्नागिरी शहरानजीक असलेल्या मिरकरवाडा बंदरातील वर्षानुवर्षे असलेले अतिक्रमण हटवण्यात पुढाकार घेतला. त्यांनी केलेली ही धडक कारवाई अद्यापही चर्चेचा विषय ठरत आहे. आता पक्षाने या जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून त्यांच्यावर नवी जबाबदारी सोपवली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात भाजपच्या विचारांचे मतदार आहेत. अशावेळी रत्नागिरीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी नितेश राणेंवर सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा भाजपकडून या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे.

