• Fri. Mar 6th, 2026
    ‘भगवानगड तुमच्या पाठीशी’, महंत नामदेव शास्त्रींचा सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबाला आधार

    Deshmukh Family Met Namdev Shastri At Bhagwangad: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली.

    महाराष्ट्र टाइम्स

    बीड: संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी रविवारी भगवानगडावर जाऊन भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. यावेळी धनंजय देशमुख यांनी संतोष देशमुख यांच्या खुनातील आरोपींच्या गुन्हेगारीचा पाढा वाचून ‘संतोष देशमुख यांचे काय चुकले,’ असा प्रश्न केला. त्यानंतर नामदेव शास्त्री यांनी भगवानगड कायम देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले.

    देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, वैभवी देशमुख हे आपली बाजू समजावून सांगण्यासाठी गडावर गेले. नामदेव शास्त्री यांची भेट घेऊन संतोष देशमुख यांच्या खूनामागील खरे कारण, आरोपींचा पूर्व इतिहास, त्यांची गुंडगिरी, खंडणीचे प्रकार, त्यांच्यावरील गुन्हे हे पुराव्यानिशी मांडले. या वेळी धनंजय देशमुख यांनी ‘आम्ही कधीच जातीवाद केला नसून आमची जमीन मुंडे कुटुंब दोन पिढ्यांपासून कसत आहे. त्यांनी पिकविलेले अन्नधान्य आम्ही खात आहे,’ असे सांगितले.

    ‘लोकप्रतिनीधी जातीयवादी नाहीत’

    ‘आमची कोणतीही गुन्हेगारी नसून १५ वर्षे सरपंच राहिलेल्या माणसाशी या लोकांनी संपर्क साधायला हवा होता. आरोपींवर आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. ज्याला आरोपींची बाजू घ्यायची, त्यालाच जातीयवादाचा अंश येत आहे. आरोपी त्यांच्या कार्यालयात बसायचे, त्यांच्या गाडीत फिरायचे. हा न्यायाचा लढा आहे. अतिशय क्रूर हत्या झाली आहे. प्रत्येक क्षेत्रातील लोक आपल्यासोबत आहेत. राजकीय नेते, संप्रदायाचे लोक, सामाजिक कार्यकर्ते ते आमच्यासोबत व न्यायाच्या भूमिकेत आहेत. अशा वेळी लोकप्रतिनिधींना जातीयवादी म्हणू नका. नाही तर ते कोणत्याच न्यायाच्या भूमिकेत येणार नाही. न्याय मागणाऱ्या लोकप्रतिनिधींना चुकीचे ठरवू नका,’ अशी विनंती धनंजय देशमुख यांनी केली.

    ‘खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी’

    नामदेव शास्त्री म्हणाले, ‘संतोष देशमुख यांनी किती काम केले, हे त्यांनी दाखवले. ते मूळचे बाबांचे आहेत, हे आज कळाले. त्यांची जमीन तीन पिढ्यांपासून वंजारी कुटुंब करीत आहे. जातीयवाद न करता खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी हे गादीवरून सांगणे आहे. आम्ही बसून बोलू. त्यांना दोन घास खाऊ घालू. त्यांना प्रसाद देऊ.,’ असे ही शास्त्री म्हणाले.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed