• Sat. Mar 14th, 2026

    महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा राडा, उपांत्य फेरीत पराभवानंतर शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली

    महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा राडा, उपांत्य फेरीत पराभवानंतर शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली

    महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लावणारी घटना आज घडली आहे. अहिल्यानगरमध्ये 67 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा सामना पार पडत असताना मोठा राडा झाल्याचं बघायला मिळालं. डबल महाराष्ट्र केसरी अशी ख्याती असलेला पैलवान शिवराज राक्षे याने पराभवानंतर पंचांना लाथ मारली. त्यामुळे अहिल्यानगरच्या वाडिया पार्क मैदानावर मोठा गोंधळ उडाला.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    अहिल्यानगर : कोणताही खेळ खेळताना खेळाडू वृत्ती बाळगली पाहिजे. खेळ हा खेळासारखा खेळायला हवा. खेळताना खेळाडू वृत्ती असायला हवी. खेळामध्ये पंचांचा निर्णय अंतिम असतो. पण पंचांनी पराभवाचा निकाल दिल्यानंतर त्यांना मारहाण करणं योग्य नाही. पण तशी घटना आज साक्षात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत घडली आहे. महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य फेरीत पराभव झाल्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी अशी ख्याती असलेला पैलवान शिवराज राक्षे याने थेट पंचांना लाथ मारली. त्यामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अभूतपूर्व असा गोंधळ उडाला. अखेर पोलिसांना यावेळी मध्यस्थी करावी लागली. शिवराज राक्षे यावेळी तिथे उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेला आणि त्याने त्यांच्याकडे रिव्ह्यूची मागणी केली. अजित पवारांच्या भेटीनंतर शिवराज राक्षेने माध्यमांना देखील प्रतिक्रिया दिली.

    उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोर राडा

    अहिल्यानगरमध्ये 67 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा उपांत्य सामना पार पडत असताना मोठा गोंधळ उडाल्याचं बघायला मिळत आहे. गादी विभागामधून नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी ठरलेला पैलवान शिवराज राक्षे विरुद्ध पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांच्यात उपांत्य फेरीचा सामना पार पडत होता. दोघांमध्ये काँटेची टक्कर सुरु असताना शिवराज राक्षे याचा पराभव झाला. यानंतर शिवराज राक्षे याला इतका राग अनावर झाला की त्याने पंचांना लाथ मारली. यामुळे कार्यक्रमस्थळी मोठा गोंधळ उडाला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे उपस्थित होते. त्यांच्यासमोर हा राडा झाला.

    शिवराज राक्षे काय म्हणाला?

    “पंचांनी चुकीचा निर्णय दिला आहे. आम्हाला हा निर्णय मान्य नाही. तुम्ही रिप्ले बघा. प्रतिस्पर्ध्याने डाव केला असेल, प्रतिस्पर्धेचे दोन्ही खांदे टेकले असतील तर कुस्ती फोल होते. तुम्ही रिव्ह्यू बघा. माझे दोन्ही खांदे टेकले नाहीत. चॅलेंज टाकल्यावर निर्णय देता येत नाही. कुस्ती चित झाली असेल तरच तुम्हाला निर्णय देता येतो. अर्जंटमध्ये कुस्तीचा पुकार पंचांनी केला. मल्लाला दहा ते पंधरा मिनिटे तरी वेळ द्यायला पाहिजे. आम्हाला रिप्ले दाखवा, अशी आमची मागणी आहे”, अशी प्रतिक्रिया शिवराज राक्षेने दिली.

    “कुस्ती झालेली नाही. ही कुस्ती देवून टाकलेली आहे. आम्ही अजित पवारांकडे रिव्ह्यू दाखवा,अशी मागणी केली आहे. कुस्ती झाली असेल, माझी पाठ टेकली असेल तर आम्ही आमचा पराभव मान्य करतो. आम्ही वर्षभर कष्ट करतोय. या पंचांना काय माहिती आम्ही किती मेहनत करतोय. अजित दादांनी रिव्ह्यू दाखवायला लावला आहे. कुस्ती चित झालीच नव्हती. पंचांचा शंभर टक्के चुकीचा आहे. पंचांचा एक तरी पोरगा आहे का कुस्तीत? ज्यांचे कर्म त्यांच्यापाशी”, असं शिवराज राक्षे माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर म्हणाला.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed