‘घटनाबाह्य व अनैतिक मुख्यमंत्र्यांच्या कंत्राटदार मित्रांना फायदा मिळवून देण्यासाठी, महाराष्ट्रातील बेकायदा राजवटीच्या वतीने, तुमच्या थेट निरीक्षणाखाली पालिकेने सुरू केलेल्या महारस्ते घोटाळ्याला जवळपास एक वर्ष झाले आहे. या रस्त्यांच्या कंत्राटातील अनियमितता आम्ही सातत्याने मांडली आहे. तुम्ही ज्या पद्धतीने ही कंत्राटे त्यांना ‘भेट’ दिलीत इथपासून, ते त्या कंत्राटदारांना मिळणारा अवास्तव पैसा, मुंबईकरांच्या पैशातून कंत्राटदारांना होणारा प्रचंड आर्थिक नफा आणि हे सगळे होताना प्रत्यक्षात मुंबईत काहीही कामे झालेली नाही इथपर्यंतची माहिती दिली’, असे आदित्य यांनी म्हटले आहे.
‘प्रशासक म्हणून तुमच्या देखरेखीखाली मागच्या एका वर्षाच्या काळात पालिकेची दयनीय अवस्था झाली आहे. स्ट्रीट फर्निचर घोटाळा असो की रस्ते घोटाळा, सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन घोटाळा असो की सुशोभीकरण घोटाळा आणि असे अजून बरेच घोटाळे आम्ही उघड करणार आहोत. पालिकेची कार्यक्षमता ढासळत चालली असून प्रचंड भ्रष्टाचार वाढत चालला आहे. दक्षिण मुंबईतील रस्त्यांच्या कामातील घोटाळ्यासाठी निलंबित करण्यात कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे का? केले असल्यास, ती माहिती सार्वजनिक करावी आणि इतर सर्व राज्ये आणि शहरांनाही त्याबद्दल माहिती द्यावी. या कंत्राटदाराला त्याच्या गुन्ह्यासाठी दंड भरावा लागला आहे का? दक्षिण मुंबईतील रसतेकामे कधी सुरू केली जातील? दिलेल्या कामांमधील सद्यस्थितीत किती कामे सुरू झाली आहेत? त्यांची आजची स्थिती काय आहे? कामाची सद्यस्थिती तपासता यावी यासाठी मुंबईकरांना आश्वासन दिलेले सीसीटीव्ही आणि सार्वजनिक डॅशबोर्ड मुंबई पालिकेने बसवले आहेत का’, असे प्रश्न या पत्रात विचारले आहेत.
‘पाठीशी घालणारी उत्तरे नकोत’
‘उपस्थित केलेले काही मूलभूत आणि साधे प्रश्न आहेत. या प्रश्नांची धादांत खोटी आणि भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारी उत्तरे प्रतिसाद म्हणून आम्हाला पाठवली जाणार नाहीत. कारण, सध्या अनैतिक राजवटीच्या काळात पालिकेत तसेच करण्याचा आदेश आहे, असा आरोप करत निवडून आलेले लोकप्रतिनिधी नसताना पालिकेत सध्या गोंधळाचे, अपारदर्शक पद्धर्तीचे, भ्रष्टाचाराचे आणि जुलमी राजवटीचे थैमान सुरू आहे. आजवर जसा प्रतिसाद मिळाला, किंवा मिळालाच नाही तसे होणार नाही आणि या वेळेस कृती होईल’, अशी अपेक्षा आदित्य यांनी व्यक्त केली आहे.
