• Sat. Sep 21st, 2024

लाठीचार्जनंतर वातावरण तणावपूर्ण; शनिवारी जालना जिल्हा बंदची हाक, फक्त या गोष्टी सुरू राहणार

लाठीचार्जनंतर वातावरण तणावपूर्ण; शनिवारी जालना जिल्हा बंदची हाक, फक्त या गोष्टी सुरू राहणार

जालना: जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे मराठा आरक्षणासाठी लोकशाही मार्गाने व शांततेत आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. ज्यात अनेक आंदोलक जखमी झाले,ज्यात महिला आणि युवतींचा समावेश होता. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पडत आहेत. अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या आहेत.

जालन्यात झालेल्या या घटनेच्या निषेधार्ह मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जालना जिल्हा बंदची हाक देण्यात येत आहे. आरोग्य सुविधा, शाळा व महाविद्यालय सोडता सर्व व्यापारी प्रतिष्ठान, वाहतूक, बाजार पेठा बंद ठेवून समस्त जालनाकरांनी सहकार्य करावे, अशी विनंती जालना जिल्हा मराठा मोर्चा वतीने करण्यात येत आहे.

जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज; मोठ्या प्रमाणात दगडफेक, पोलिसांकडून हवेत गोळीबार
२९ ऑगस्टपासून मराठा मार्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह १० जण आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणला बसले होते. काल पोलिसांकडून आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला होता. पण त्याला विरोध झाला. त्यानंतर आज पोलिस आणि आंदोलक यांच्यात चर्चा सुरू असताना पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार आधी दगडफेक झाली आणि त्यानंतर लाठीचार्ज करण्यात आला. आक्रमक आंदोलकांना शांत करण्यासाठी पोलिसांनी हवेत दोन राऊंड फायर केले. गेल्या चार दिवसांपासून शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक झाले.

या घटनेचे पडसाद राज्यातील विविध भागात उमडले. धुळे-सोलापूर महामार्गावर काही बस जाळण्यात आल्या. आता पोलिसांच्या लाठीचार्जच्या निषेधार्ह उद्या जालना, बीड जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे.

शांततेत असलेल्या मराठा आंदोलनाला हिंसक वळण; महामार्गावर बसेसची जाळपोळ
मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी

मराठा क्रांती मोर्चा आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमी पोलिस व नागरिकांना जालना येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात आणण्यात आले असून त्यांची संख्या ५३ असल्याचे प्रभारी शल्य चिकित्सक डॉ.प्रताप घोडके यांनी सांगितले आहे. सर्व जखमी वर उपचार सुरू असून कोणीही गंभीर जखमी नाही.

जालना येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भेटण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण हे जिल्हा रुग्णालयात येणार आहेत. जिल्हा सरकारी रुग्णालयात भेटीदरम्यान विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण हे माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ हे देखील रुग्णालयात भेट देणार आहेत. दरम्यान राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा घनसावंगी चे आमदार राजेश टोपे यांनी जखमींची भेट घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed