महापालिकेकडून यंदागणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी ‘एक खिडकी’ पद्धतीतून ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. १ ऑगस्टपासून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. यामुळे गणेश मंडळांना पोलिस, वाहतूक पोलिस व अग्निशमन दल यांच्याकडे परवानगीसाठी वेगळे अर्ज करण्याची गरज नाही. मात्र, महापालिकेने मंडळांना हमीपत्र देणे बंधनकारक केले आहे. त्यानंतरच मंडप परवानगी मिळणार आहे. परंतु, हमीपत्रात ‘स्थापन करत असलेली चार फुटापर्यंतची मूर्ती शाडू, पर्यावरणपूरक साहित्याने घडवलेली असेल हे आम्हाला मान्य असेल,’ अशा अनेक अटी हमीपत्रात आहेत. त्यामुळे मुंबईतील गणेश मंडळांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. मुंबईतील बहुतांश मंडळांच्या मूर्ती या उंच आणि ‘पीओपी’च्या आहेत. हमीपत्रातील अटींमुळे अनेक मंडळांनी मंडप परवानगीही घेतलेल्या नाहीत, तर काहींनी परवानगीसाठी अर्ज करूनही त्या प्रलंबितच आहेत.
जीएसबी सेवा मंडळालाही मंडप उभारणीसाठी अडचणी आल्या. यासंदर्भात जीसएबी सेवा मंडळाचे अध्यक्ष विजय कामत यांनी, आमच्या मंडळाची मूर्ती ही शाडूची असली, तरीही मूर्तीची उंची १४ फूट आहे. हमीपत्रात चार फुटांपर्यंतच्या मूर्तीची अट आहे. संभ्रम निर्माण झाल्याने आम्ही अर्ज केला नाही. यासंदर्भात मुंबई महापालिकेच्या परिमंडळ २ चे उपायुक्त आणि गणेशोत्सव समन्वयक रमाकांत बिरादार यांच्याशी हमीपत्रातील मुद्द्यांवरून चर्चा करून त्यातील अटी मागे घेऊन मंडळांना दिलासा देण्याची मागणी केली आहे. घाटकोपर पश्चिमेला पारशिवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव ओंकार सावंत यांनीही, हमीपत्रातील अटींबाबत नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या मंडळाची मूर्ती ही पावणे चार फुटांची आहे. मात्र, गेली ३५ वर्षे ती ‘पीओपी’ची करत आहोत. हमीपत्रातील अटींमुळे गोंधळ निर्माण झाला असून, मंडप उभारणीसाठी परवनागी घेतलेली नाही. महापालिकेच्या ‘एन वॉर्ड’ या घाटकोपर पूर्व पश्चिममधील २४ मंडळांनी मंडप परवानगीसाठी ऑनलाइन अर्ज केले. हमीपत्र सादर न केल्याने मंडप परवानग्या रखडल्या आहेत. तर मुंबईतील अन्य वॉर्डमध्येही तीच परिस्थिती आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना चार फुटांपर्यंतची मूर्ती आणि पर्यावरणपूरक मूर्तीची अट नाही, असे नमूद असलेले नवीन हमीपत्र तयार करण्यात आले आहे. लवकरच त्याची मंजुरी वरिष्ठांकडून घेण्यात येणार आहे.
– रमाकांत बिरादार, उपायुक्त आणि गणेशोत्सव समन्वयक
गणेश मंडळांना मंडप परवानगीसाठी हमीपत्र बंधनकारक असून, त्यात चार फुटांपर्यंतची मूर्ती आणि पर्यावरणपूरक मूर्तीची अट आहे. ही अट काढण्याची विनंती केली आहे. मागणी करूनही त्यावर निर्णय होत नसल्याने मुंबईतील अनेक सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडप परवानग्या रखडल्या आहेत.
– अॅड. नरेश दहीबावकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती