• Sat. Sep 21st, 2024

कंटेनरनं अचानक ब्रेक मारला, बस चालकानं धडक होण्यापासून वाचवलं, एसटी पुलावरुन खाली गेली

कंटेनरनं अचानक ब्रेक मारला, बस चालकानं धडक होण्यापासून वाचवलं, एसटी पुलावरुन खाली गेली

जालना : राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटीच्या अपघातांची मालिका सुरु आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसदहून मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसला जालना जिल्ह्यात अपघात झाला आहे. हा अपघात मंठा तालुक्यातील केंदळी गावाजवळ घडला आहे. बस मध्ये ३० ते ४० प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातग्रस्त एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी काहीजण किरकोळ जखमी झाले आहेत तर काहींना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर मंठा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू,काहींना जालना शासकीय रुग्णालयात आणले.

अपघात कसा घडला?

पुसदहून मुंबईला जाणाऱ्या बसचा जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील केंदळी गावाजवळ अपघात घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार समोरुन येत असलेल्या कंटेनरने अचानक ब्रेक मारल्याने बस चालकानं धडक वाचवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात एसटी बस पुलावरून खाली घसरून हा अपघात घडल्याचे समजते आहे. बस मध्ये ३० ते ४० प्रवासी प्रवास करीत होते. या घटनेत काही जण किरकोळ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर मंठा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुणेकरांसाठी मोठी गुड न्यूज; वाहतूक कोंडीतून सुटका, चांदणी चौकातील उड्डाणपूलासह रस्त्यांचे काम पूर्ण

बसची समोरासमोर धडक, चालकांसह २९ प्रवासी गंभीर जखमी

गंभीर प्रवाशांवर जालना जिल्हा रुग्णालयात उपचार

यवतमाळ जिल्ह्यातील पुसदहून मुंबईकडे जाणाऱ्या बसला जालना जिल्ह्यात अपघात झाल्यानंतर किरकोळ जखमी असलेल्या प्रवाशांवर मंठा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. तर, गंभीर जखमी झालेल्या काही प्रवाशांना जालना येथे जिल्हा रुग्णालयात आणले आहे. या घटनेत सुदैवाने कुठलीच जीवितहानी झाली नाही. अपघात स्थळी रुग्णवाहिका दाखल झाल्या असून मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. दरम्यान अपघात स्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.काही प्रवाशांना जालना सामान्य रुग्णालयात आणण्यात आले आहे.
पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! नवीन आठ मार्गावर पीएमपीची मेट्रो फिडर सेवा होणार सुरू

जालना जिल्हाधिकाऱ्यांनी काय माहिती दिली?

जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील केंधळी येथे पुसद मुंबई बसचा अपघात घडला असून बस मध्ये ४२ प्रवासी प्रवास करीत होते. बस समोर एक कंटेनर आल्यानं बसची धडक वाचवण्यासाठी बस चालकाने उजवीकडे बस वळवण्याचा प्रयत्नात बस रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली. या घटनेत जवळपास ३४ प्रवसी जखमी झाले असून पैकी २० जणांना किरकोळ दुखापत झाली असल्याने त्यांना मंठा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय तर १४ जणांना जालन्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलय,असं जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी म्हटलं आहे.

आतापर्यंत ८ जखमींना रुग्णालयात आणण्यात आलं असून अन्य ६ जखमींना देखील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी म्हटलंय.सर्व जखमी प्रवाशांची प्रकृती स्थिर आहे,काहींना डोक्याला इजा झाली असल्याने त्यांच्या डोक्याला काही गंभीर दुखापत झाली आहे का यासाठी त्यांचं सी. टी. स्कॅन करण्यात येणार आहे. तर २० प्रवासी किरकोळ जखमी झाले होते त्यांना मंठा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीय.

दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटी बसेसच्या अपघातांचे प्रमाण वाढलेलं आहे.रस्त्यावरुन प्रवास करताना वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम न पाळल्यानं आणि रस्त्यांची दुरवास्था असल्यानं अपघाताच्या घटना घडत आहेत. वाहनचालकांनी नियमितपणे वाहनांची तपासणी करुन घेऊन वाहतूक नियमांचं पालन केल्यास अपघातांचं प्रमाण कमी होऊ शकतं.

मुंबईकरांसाठी गुड न्यूज, अखेर १० टक्के पाणी कपात रद्द, महापालिकेचा मोठा निर्णय, जलसाठ्याची स्थिती जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed