शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ब्राह्मणगावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ ही घटना घडली. निखिल रमेश कांबळे (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. सोमवारी दुपारी त्याच्या पार्थिवावर तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
या प्रकरणी उपसरपंच शशीकलाबाई रमेश कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. उपसंरपचपदाचा राजीनामा देण्याच्या कारणावरून आरोपींनी साथीदारांसह जातीवाचक शिवीगाळ केली. पती, लहान मुलगा स्वप्नील यास लाथाबुक्याने मारहाण केली व मोठा मुलगा निखिल याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्याला रॉड व दगडाने डोक्यात मारले. त्यात गंभीर दुखापत झाल्याने निखिल उपचारादरम्यान मरण पावला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
यावरून आरोपी साधना डोईफोडे, केशव डोईफोडे, पूनम डोईफोडे, महादेव डोईफोडे, कौसाबाई डोईफोडे (सर्व रा. ब्राह्मणगाव ता. सेलू) यांच्याविरुद्ध खुनाच्या गुन्ह्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ओव्हाळ तपास करत आहेत. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी अधिकारी सुनील ओव्हाळ, पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांनी तातडीने ब्राह्मणगावात पोलीस बंदोबस्त तैनात केला. पोलीस अधीक्षक रागसुधा आर., अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी रविवारी रात्री उशिरा भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या पार्श्वभूमीवर गावात तणावपूर्ण शांतता पसरली आहे.