यावेळी संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला. दिल्लीत मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरु आहेत की नाही, हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना जाऊन विचारा. या सगळ्यामुळे मुख्यमंत्री सध्या तणावात आहेत. ते हल्ली मंत्रालयात जातात का हे विचारा, असे संजय राऊत यांनी म्हटले.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी महाविकास एकत्र लढणार की नाही, याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे एक वक्तव्य सध्या गाजत आहे. आम्ही एकत्र लढणार की नाही, याबाबत बोलायचे झाल्यास आमची तशी इच्छा आहे. पण केवळ इच्छा असून चालत नाही. जागावाटपातील अडचणींवर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. त्यावर अद्याप चर्चा झाली नसल्याने आत्ताच काही सांगता येत नाही, असे शरद पवार यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावरुन महाविकास आघाडीच्या ऐक्याविषयी संभ्रम निर्माण झाला होता. परंतु, संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला. मविआच्या उभारणीत शरद पवार यांचा महत्त्वाचा वाटा आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र राहिले तर २०२४ मध्ये आपण भाजपचा पराभव करू शकतो, ही पवार साहेबांची भूमिका आहे. त्यामुळे ते महाविकास आघाडीबाबत अशी काही भूमिका घेतील, असे मला वाटत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.