• Thu. Sep 17th, 2026

महाराष्ट्रातील भाजप आमदाराची माघार; तरीही PM मोदींच्या बालमित्राला जमीन मिळणार नाही; कारण काय?

भाजप आमदारानं बळकावलेली जमीन परत मिळत नसल्यानं असगर अली वोहरा यांनी गेल्या आठवड्यात थेट पंतप्रधान मोदींची भेट घेतली. असगर अली वोहरा हे मोदींचे बालमित्र आहेत.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ठाणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बालमित्र असगर अली वोहरा यांच्या जमीन वादानं नवं वळण घेतलं आहे. भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी जमिनीशी संबंधित करार रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतरही असगर अली वोहरा यांना त्यांची जमीन मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला नाही. कारण या जमिनीवर काम करणाऱ्या विकासकानं वेगळाच दावा केला आहे. वोहरा जानेवारी २०२६ मध्ये खटला हरले असून त्यांनी ९० दिवस उलटल्यावर अपील दाखल केलं असल्याचा दावा विकासकानं केला आहे.

असगर अली वोहरा यांनी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. जमीन हडपल्याची तक्रार घेऊन वोहरा ८ सप्टेंबरला मोदींना भेटले होते. वोहरा यांच्या दाव्यानुसार, १९८९ मध्ये त्यांनी भाईंदर पूर्वेतील नवघर परिसरात २,८१० चौरस मीटर जमीन खरेदी केली होती. २०११ मध्ये स्वयं बिल्डर्स आणि नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कंस्ट्रक्शननं या जमिनीवर कब्जा केल्याचा वोहरा यांचा आरोप आहे. जवळपास १५ वर्षे वोहरा यांनी जमिनीसाठी सरकारच्या विविध विभागांचे उंबरठे झिजवले.

गेल्या आठवड्यात पंतप्रधान मोदींची भेट घेऊन वोहरा यांनी त्यांची समस्या सांगितली. त्यावर मोदींनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यानंतर सरकारी पातळीवर हालचालींना वेग आला. मंगळवारी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी मंत्रालयात यासंदर्भात मंत्रालयात महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला असगर अली वोहरा, आमदार नरेंद्र मेहता, मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्त राधा विनोद शर्मा, नगर रचनाकार पुरुषोत्तम शिंदे उपस्थित होते.

या बैठकीत भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी नगरविकास विभागाला पत्र देऊन वादग्रस्त जमिनीवरील कब्जा सोडण्याची आणि आपल्या कंपनीला मिळालेली बांधकाम परवानगी मागे घेतल्याची माहिती दिली. आपण ही जमीन २०१९ मध्ये मर्विन फर्नांडिस यांच्याकडून खरेदी केली होती, असं मेहतांनी सांगितलं. वोहरा यांच्या विरोधात दाखल केलेली पोलीस तक्रार मागे घेत असल्याचंही मेहता म्हणाले. जमीन असगर अली वोहरा यांना दिली जाणार नाही. व्यवहार रद्द झाल्यानं ती पुन्हा मर्विन फर्नांडिस यांच्याकडे जाईल, असं मेहता यांनी सांगितलं.

दुसरीकडे स्वयं बिल्डर्सचे डेव्हलपर शेफाल जैन यांनी असगर अली वोहरा यांच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘वोहरा जानेवारी २०२६ मध्ये खटला हरले आहेत आणि त्यांनी ९० दिवस उलटून गेल्यावर न्यायालयाच्या निकालाविरोधात अपील दाखल केलं आहे. वोहरा सहमालकाकडून पॉवर ऑफ अटॉर्नी सादर करण्यात अपयशी ठरल्याचं न्यायालयानं आदेशात म्हटलं आहे,’ असं जैन यांनी सांगितलं.