- राज्यातील सर्व विशेष शिक्षकांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करणार
मुंबई, दि. ३ – सर्वसमावेशक विकास हा आपल्या भारतीय संस्कृतीचा मूळ गाभा असून समाजात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाला योग्य संधी व वातावरण मिळणे गरजेचे आहे. ‘विकसित महाराष्ट्र 2047’ या ध्येयाकडे वाटचाल करताना समाजातील प्रत्येक घटकाचा विकास होणे आवश्यक असून ‘दिशा’ अभियानाच्या माध्यमातून विशेष मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली जात आहे. या अभियानाशी जोडलेल्या राज्यातील सर्व विशेष शिक्षकांना त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल राज्य शासनाच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.विशेष मुलांना योग्य शिक्षण, संधी आणि वातावरण उपलब्ध करुन देणे ही सामूहिक जबाबदारी असून या क्षेत्रात महाराष्ट्र देशासाठी दिशादर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात विशेष शिक्षकांचा प्रातिनिधिक स्वरूपात राज्यस्तरीय सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास जय वकील फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना चंद्र, एसीईसीएफचे सह संस्थापक अमित चंद्र, जय वकील फाऊंडेशनच्या अध्यक्ष व संचालक डॉ. अनायता हेगडे, बजाज फिनसर्व्हच्या अध्यक्षा शेफाली बजाज, एचटी पारेख फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी झिया लालकाका, दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव माणिक गुरसळ, आयुक्त सत्यजित बडे, समग्र शिक्षा अभियानचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव, राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्थानचे संचालक राम कुमार, मुख्यमंत्री यांच्या विशेष कार्य अधिकारी प्रिया खान यांच्यासह राज्यभरातील विशेष शिक्षक ऑनलाईन उपस्थित होते.
‘दिशा‘ अभियान राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विशेष मुलांचे मूल्यमापन केवळ गुणांवर न होता, त्यांचा आत्मविश्वास आणि समाजात समरस होण्याची क्षमता यावर होते. सर्व शाळांमध्ये ‘दिशा’ अभियान स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. सध्या राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये 450 हून अधिक शाळा, 2700 हून अधिक शिक्षक आणि 21 हजारांहून अधिक दिव्यांग व बौद्धिक अक्षम विद्यार्थी या अभियानाशी जोडले गेले आहेत. या मुलांना वैज्ञानिक आणि नव्या अध्यापन तंत्राच्या आधारे शिक्षण देण्यासाठी लागणारी साधनसामग्री या उपक्रमामुळे उपलब्ध झाली आहे.
या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात पाच शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यांत समारंभपूर्वक सर्व विशेष शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करावे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. ‘दिशा’ अभियान हा शासनाच्या प्राधान्यक्रमातील महत्त्वाचा उपक्रम असून, याच्या प्रगतीचा व अडचणींचा ‘वॉर रूम’ मधून नियमित आढावा घेतला जाईल, दिव्यांग कल्याण विभागामार्फत दरवर्षी प्रत्येक विशेष मुलापर्यंत व त्याच्या कुटुंबापर्यंत दिशा अभियानाची उपयुक्त छापील वर्कबुक्स पोहोचविली जातील, त्याचप्रमाणे नियमित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या बौद्धिक अक्षमता असलेल्या बालकांसाठी नियमित शिक्षकांच्या प्रशिक्षणात या अभ्यासक्रमाचा अंतर्भाव करण्यासाठी दिव्यांग कल्याण विभाग आणि जय वकील फाऊंडेशन एकत्रित प्रयत्न करतील आणि बालकांमधील विशेष गरजांची वेळीच ओळख व्हावी यासाठी विशेष ‘प्रशिक्षण मॉड्यूल’ विकसित करण्यात येईल, असे सांगून यासाठी जय वकील फाऊंडेशनने पुढाकार घ्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
राज्य शासनासह समाज आणि सेवाभावी संस्थांच्या एकत्रित सहभागामुळे या क्षेत्रात मोठे काम उभे राहिले असून, या मॉडेलच्या माध्यमातून महाराष्ट्र दिव्यांग शिक्षणाच्या क्षेत्रात संपूर्ण देशात दिशादर्शक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. जय वकील फाउंडेशन, बजाज फिनसर्व्ह, एचटी पारेख फाउंडेशन आदी सामाजिक संस्थांनी या संवेदनशील विषयावर दाखविलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी विशेष आभार मानले.
शिक्षकांचा प्रातिनिधीक सन्मान
बौद्धिक अक्षम मुलांसाठी भारतातील पहिला प्रमाणित व एकसमान अभ्यासक्रम असलेल्या ‘दिशा अभियानाची’ प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल यामिनी काळे (नवजीवन मतीमंद मुलांची शाळा, छत्रपती संभाजीनगर), अण्णासाहेब कदम (पांडुरंग निवास मतीमंद विद्यालय, लातूर), वैशाली गायकवाड (नंदनवन दुर्बल मनस्क मुलांची शाळा, नागपूर), ज्ञानेश्वर काळे (कै. रावसाहेब निवासी मतीमंद विद्यालय, देवळी, वर्धा) आणि मानसी मुलाम, जय वकील स्कूल फॉर चिल्ड्रन इन नीड ऑफ स्पेशल केअर, मुंबई शहर या पाच विशेष शिक्षकांच्या उल्लेखनीय कार्याचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त सत्यजित बडे यांनी प्रास्ताविकाद्वारे विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची तर अर्चना चंद्र यांनी जय वकील फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या दिशा अभियानाची माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विशेष कार्य अधिकारी प्रिया खान यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.
०००००
बी सी झंवर/विसंअ