Ketan Agarwal Sister Video : रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ केतन अग्रवाल याच्या आठवणीने व्याकूळ झालेली बहीण संजना हिला अश्रू अनावर झाल्याचा व्हिडिओ पाहायला मिळत आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : पुण्यातील २५ वर्षीय व्यावसायिक केतन अग्रवाल याची नियोजित पत्नी सिया गोयल हिने लोहगड किल्ल्यावरुन ढकलून हत्या केल्याच्या घटनेला दोन महिने उलटून गेले आहेत. रक्षाबंधनाच्या दिवशी केतनची २० वर्षीय बहीण संजना अग्रवाल हिला आपल्या भावाची कमतरता पुन्हा एकदा तीव्रतेने जाणवत आहे. आपल्या भावाच्या आठवणीने व्याकूळ झाल्याने संजनाला अश्रू अनावर झाल्याचा व्हिडिओ पाहायला मिळत आहे. यावर्षीच्या रक्षाबंधनाला प्रेमळ नातं साजरं करण्यासाठी केतन सोबत नसेल, त्याऐवजी केवळ त्याच्या आठवणी, फोटो आणि न्यायासाठीची अखंड प्रतीक्षा उरल्याचं ती म्हणते.
अपराधीपणाची भावना
“ही अपराधीपणाची भावना मी आयुष्यभर सोबत बाळगेन” असं म्हणत संजनाने आपल्या भावाला वाचवू न शकल्याचं दुःख व्यक्त केलं. तिने आठवण सांगितली की, एकेकाळी या दोघांनी केतनच्या लग्नात जल्लोष करण्याचे, एकत्र प्रवास करण्याचे आणि असंख्य आठवणी निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले होते. ती म्हणते की, ती स्वप्ने अचानक धुळीस मिळाली.
संजनासाठी रक्षाबंधन हा आता तिच्या भावाच्या अनुपस्थितीची वेदनादायी आठवण करुन देणारा सण बनला आहे. इतर कुटुंबं जेव्हा बहीण-भावाचे नाते साजरे करत असतील, तेव्हा तिला मात्र केतनविना रक्षाबंधन साजरी करावी लागत आहे.
आरोपींना मिळणारी विशेष वागणूक आणि आरोपाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत संजना म्हणाली की, आता त्यांच्या कुटुंबातील सणांची जागा न्यायाच्या मागणीसाठी काढल्या जाणाऱ्या ‘कँडल मार्च’ने घेतली आहे. न्यायासाठीच्या या लढ्यात जनतेने आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहावे, असे भावूक आवाहन तिने केले. “या रक्षाबंधनालाही माझा भाऊ माझ्यासोबत नाही, पण आमचे नाते मात्र कायमस्वरुपी टिकून राहील.” असं ती म्हणाली.
संजना काय म्हणाली?
“मी माझ्या भावाचं रक्षण करु शकले नाही. ती केवळ त्याची लढाई नव्हती, ती माझीही होती. मी त्याला वाचवू शकले नाही. त्याबद्दलची अपराधीपणाची भावना आणि वेदना आयुष्यभर माझ्यासोबत राहतील. पण सध्या, मी फक्त न्यायाची वाट पाहत आहे. मला फक्त हे जाणून घ्यायचे आहे, की जर माझ्या भावाने किंवा कोणत्याही मुलाने एखाद्या मुलीसोबत असं काही केलं असतं, तर कदाचित आमचं संपूर्ण कुटुंब आतापर्यंत तुरुंगात असतं. आमच्यावर अनेक गुन्हे दाखल केले गेले असते.” असं संजना व्हिडिओत म्हणाली.
“समाज सहसा स्त्रियांची अधिक बाजू घेतो. पण तिला (सिया) केवळ मुलगी असल्यामुळे पाठिंबा आणि ‘व्हीआयपी’ वागणूक मिळत आहे. तिला तिच्या कुटुंबाचा आर्थिक पाठिंबा आहे. तिला अपराधीही वाटत नाही आणि मला वाटतं की याचं एकमेव कारण म्हणजे ती मुलगी आहे. आणि आम्ही पाहिलेली स्वप्नं, जी स्वप्नं मी माझ्या भावासाठी पाहिली होती—ती आता कधीच पूर्ण होणार नाहीत.” अशी खंत संजनाने व्यक्त केली.
वरातीऐवजी कँडल मार्च काढण्याची वेळ
“आम्ही कल्पना केली होती की आईही आमच्यासोबत येईल. आम्हाला वाटलं होतं, खूप मजा येईल; मला आणखी एक बहीण मिळेल. आम्ही प्रवासाचं नियोजन केलं होतं, केतनला प्रवासाची खूप आवड होती, अनेक ठिकाणी जायचे आणि छान वेळ घालवायचा असं ठरलं होतं. पण आता यातील काहीच घडणार नाही. केतनच्या लग्नाच्या वरातीत पुढे नाचण्याचं मी स्वप्न पाहिलं होतं; मला सर्वात जास्त नाचायचं होतं—तो ज्या घोड्यावर स्वार असेल, त्याच्या अगदी समोर नाचायचं होतं. त्याऐवजी, मला त्याच्यासाठी ‘कँडल मार्च’आयोजित करावा लागत आहे—माझ्या भावाला न्याय मिळावा यासाठीचा मोर्चा.” असं संजना म्हणते.
Delhi Crime : दुसऱ्या तरुणाशी बोलते, मैत्रिणीला घरात घुसून संपवलं, फोन घेऊन पळाला, पोलिसांची जिम ट्रेनरसोबत चकमक“मला हे योग्य वाटत नाही. मला फक्त एवढीच आशा आहे की माझ्या भावाला लवकरात लवकर न्याय मिळेल. मी त्याला वाचवू शकले नाही, पण तो जिथे कुठे असेल, तिथे त्याला किमान हे तरी दिसेल की त्याला न्याय मिळत आहे, आम्ही त्याच्यासाठी लढत आहोत. मी न्यायाची वाट पाहत आहे. कृपया आम्हाला पाठिंबा द्या.” अशी विनंती संजनाने केली आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा