छत्रपती संभाजीनगर, दि. २७ : विशेष सखोल पुनरीक्षणाच्या पुढील टप्प्यात प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या अर्ज, सूचना व हरकतींवर तत्परतेने कार्यवाही करण्यासाठी सक्षम यंत्रणा सज्ज ठेवावी. मतदार यादीतील नोंदींची पडताळणी, नमुना क्रमांक ६, ७ व ८ मधील अर्जांवर कार्यवाही आणि आवश्यक दुरुस्त्या नियमानुसार पूर्ण करताना प्रक्रिया सुलभ, पारदर्शक व नागरिकाभिमुख ठेवावी, असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले.
छत्रपती संभाजीनगर विभागातील विशेष सखोल पुनरीक्षणाच्या कामाचा श्री. चोक्कलिंगम यांनी स्मार्ट सिटी कार्यालयात आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, परभणी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, लातूर जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, सहआयुक्त मंजुषा मिसकर यांच्यासह संबंधित आठही जिल्ह्यांतील उपजिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक नोंदणी अधिकारी, सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
श्री. चोक्कलिंगम म्हणाले, विशेष सखोल पुनरीक्षणाच्या कामाला गती देण्यासाठी मतदार यादीची पाने आणि नोटिसांची छपाई नियोजनबद्ध पद्धतीने वेळेत पूर्ण करावी. यासाठी जिल्हानिहाय नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी विभागातील आठही जिल्ह्यांतील छपाईची कामे, उपलब्ध यंत्रसामग्री, संबंधित संस्थांची क्षमता आणि कामाचे नियोजन यांचा त्यांनी आढावा घेतला.
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या सूचना व अर्जांवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी संबंधित यंत्रणा सक्रिय ठेवावी. एखाद्या नागरिकाचे नाव प्रारूप यादीत आढळून न आल्यास त्याची सध्याची निवासस्थिती तपासून आवश्यकतेनुसार नमुना क्रमांक ६ भरून घेऊन नियमानुसार कार्यवाही करावी. नागरिकांना प्रक्रिया व अर्जांबाबत स्पष्ट आणि सुलभ मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, असे त्यांनी सांगितले.
प्रारूप मतदार यादीबाबत नागरिकांच्या शंका व सूचनांचे निराकरण करण्यासाठी निवडणूक अधिकारी आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वय ठेवावा. मतदार यादीतील नोंदींमध्ये झालेल्या बदलांबाबत नागरिकांना स्पष्ट माहिती द्यावी. तसेच नाव समाविष्ट करणे, आवश्यक दुरुस्ती करणे किंवा नियमानुसार वगळण्याच्या प्रक्रियेबाबत योग्य मार्गदर्शन करावे.
यावेळी एसआयआरच्या पुढील टप्प्यात पात्र मतदारांची नावे मतदार यादीत कायम राहतील तसेच दावे व हरकतींची प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार पूर्ण होईल, यासाठी जिल्हानिहाय यंत्रणा सज्ज ठेवावी. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांनी आपले नाव तपासून आवश्यक असल्यास विहित मुदतीत दावा किंवा हरकत दाखल करावी. तसेच अनमॅप्ड मतदारांच्या प्रकरणांमध्ये निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी.
नोटीस बजावणे, कागदपत्रांचे संकलन आणि प्राथमिक पडताळणीसाठी स्थानिक परिस्थितीनुसार योग्य पद्धत स्वीकारावी. पात्र मतदारांचे उपलब्ध मोबाईल क्रमांक, फोटो ओळखपत्र तसेच इतर वैध ओळखपत्रांच्या माध्यमातून संपर्क व पडताळणीची प्रक्रिया सुलभ करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. याबाबतीत इतर राज्यांमध्ये अवलंबिलेल्या चांगल्या पद्धतींचा अभ्यास करून त्यांचा अवलंब करता येईल, असे त्यांनी सांगितले.
नागरिकांचे दावे, हरकती तसेच तक्रारींची तातडीने दखल घेऊन संबंधितांची आवश्यक कागदपत्रे पडताळावीत. पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत अचूकपणे समाविष्ट करण्याची प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करावी, अशी सूचना करून प्रत्येक भारतीय नागरिकाचा मतदानाचा हक्क अबाधित राखण्यासाठी निवडणूक आयोग कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
एसआयआरच्या पहिल्या टप्प्यात निवासी स्थितीची पडताळणी करण्यात आली असून, पुढील टप्प्यात प्रारूप मतदार यादी, दावे-हरकती, सुनावणी आणि त्यावरील पुढील कार्यवाहीचे नियोजन आवश्यक आहे. नागरिकत्व असलेल्या नागरिकांना अनावश्यक त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
मतदार नोंदणीची प्रक्रिया अधिक व्यापक करण्यासाठी नव्याने पात्र झालेल्या युवकांच्या नोंदणीसाठी विशेष जनजागृती करावी. महाविद्यालये, कनिष्ठ महाविद्यालये आणि मतदार साक्षरता मंचांच्या माध्यमातून जनजागृती उपक्रम राबवावेत. निवडणूक प्रक्रियेबाबत राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांच्या माध्यमातून नागरिकांना अचूक माहिती उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी सहाय्यक आयुक्त श्रीमती मिसकर यांनी छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, हिंगोली, धाराशिव व नांदेड या सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या पथकांनी निर्धारित कालावधीत एसआयआरच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण केल्याचे सांगितले.
यावेळी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या कामकाजाची माहिती दिली. हाऊस-टू-हाऊस सर्व्हे, एन्यूमरेशन फॉर्मचे वितरण व संकलन, मतदार नोंदींचे मॅपिंग व डिजिटलायझेशन तसेच अनमॅप्ड, अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार नोंद असलेल्या मतदारांची पडताळणी याबाबत जिल्हानिहाय सद्यस्थिती त्यांनी सादर केली. पुढील टप्प्यातील नियोजनाची माहितीही त्यांनी दिली.
३१ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी :
एसआयआरच्या सुधारित वेळापत्रकानुसार ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत नागरिकांना दावे व हरकती दाखल करता येतील. दावे-हरकतींवरील नोटीस बजावण्याची व ते निकाली काढण्याची प्रक्रिया २९ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असून, ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.
00000
उपसंचालक (माहिती),
विभागीय माहिती कार्यालय