• Mon. Aug 24th, 2026

Mumbai Underworld : नवऱ्याचा बदला घेण्यासाठी शारजाह स्टेडियमध्ये दाऊदची फिल्डिंग, ऐनवेळी दगाफटका, मुंबईची लेडी डॉन सपना दिदी कोण?

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची मुंबईत जेव्हा प्रचंड दहशत होती त्या काळात एक लेडी डॉन त्याला मुंबईत आव्हान द्यायची. या लेडी डॉनने अनेकदा दाऊदच्या तस्करीचा माल पोलिसांना पकडून देण्यात मदत केली होती. तिने अनेकदा दाऊदच्या आर्थिक नांग्या ठेचल्या. तसेच दाऊदला मारण्याचादेखील कट आखला. पण तिचाच भयानक शेवट झाला. या निडर लेडी डॉनची अंगावर काटा आणणारी स्टोरी आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : काही घटना या वास्तव्यात घडलेल्या असतात, पण त्या एखाद्या चित्रपटाच्या कथेसारख्या वाटतात. या वास्तविक कथांमधून खूप सारा इतिहास उलगडत जातो. या कथांमधून तो काळ आपल्या लक्षात येतो. त्या काळात नेमक्या घडामोडी कशा घडल्या असाव्यात? याची जाणीव होते. आम्ही आज अशीच एका लेडी डॉनची कथा तुम्हाला सांगणार आहोत. ही कथा मुंबईत राहून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला आव्हान देणाऱ्या सपना दिदीची आहे. खरंतर गुन्हेगारीला प्रोत्साहन देणं हा आमचा हेतू नाही. तर मुंबईत एकेकाळी जे टोळीयुद्ध व्हायचं, त्याचा खरा इतिहास लोकापर्यंत पोहोचावा हाच आमचा प्रमाणिक प्रयत्न आहे.

ज्येष्ठ पत्रकार एस. हुसेन झैदी यांच्या ‘माफीया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला मारण्याचा कट आखणाऱ्या लेडी डॉन सपना दिदीची सविस्तर माहिती सांगितली आहे. खरंतर सपना दिदी हिचं खरं नाव अशरफ खान असं होतं. अशरफ हिचं महमूद कालिया याच्यासोबत लव्ह मॅरेज झालं होतं. महमूद कालिया आणि अशरफ यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. अशरफ महमूद सोबत खूप खूश असायची. महमूद तिची खूप काळजी घ्यायचा. दोघे एकत्र खूप फिरले देखील होते.

महमूद कालिया हा नेमकं काय काम करतो? याची अशरफला कल्पना नव्हती. पण महमूद कालिया याचा बॉस दुबईला असल्याची माहिती तिला त्याच्या बोलण्यातून जाणवली होती. महमूद कालियाचं खरं नाव महमूद खान असं होतं. पण त्याच्यासोबत काम करणारे मित्र त्याला कालिया म्हणायचे. त्यातून त्याचं नाव मेहमूद कालिया पडलं होतं. पण ते अशरफला आवडायचं नाही. अशरफला महमूद सोबतचे त्याचे जोडीदार देखील आवडायचे नाहीत.

दाऊद इब्राहिमचा खास होता महमूद कालिया

महमूद कालिया हा दाऊद इब्राहिमच्या खास लोकांपैकी एक होता. त्याला दाऊदने एक काम सांगितलं होतं. पण ते काम करण्यास त्याने नकार दिला होता. मेहमूदने आपल्या पत्नीला दुबईला जाण्याआधी एका गोष्टीची कल्पना दिली होती. आपण आता दुबईला पुन्हा जाणार नाही आणि करत असलेले कामही करणार नाही. सर्वसामान्यांपणे पत्नीसोबत आयुष्य घालणार असं ठरवल्याचे महमूदने सांगितलं. याच विषयी आपण दुबईला जावून आपल्या बॉसला सांगणार असल्याचं त्याने अशरफला सांगितलं होतं.

दाऊदने कालियाचा एन्काउंटर घडवून आणला

महमूद कालिया हा दुबईला दाऊदच्या भेटीसाठी गेला. त्याने दाऊदला काम करण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर तो मुंबईच्या दिशेला परतला. महमूद कालियाने कामाला नकार दिल्याने दाऊदचा स्वाभिमान दुखावला गेला. त्यामुळे त्याने कालियाचा काटा काढवण्याचं ठरवलं. त्याच्या माणसांनी मुंबई पोलिसांना विमानतळावर महमूद कालिया येणार असल्याचं सांगत त्याचा एन्काउंटर घडवून आणला. महमूदला अशाप्रकारे संपवून दाऊदने आपल्या कामाला नकार दिल्याने काय परिणाम भोगायला मिळू शकतात, असा मेसेज त्याच्या हस्तकांना दिला.

अशरफवर दु:खाचा डोंगर कोसळला

दुसरीकडे मेहमूद कालियाला विमानतळावर घेण्यासाठी आलेली त्याची पत्नी अशरफ हिने डोळ्यांदेखत आपल्या पतीची हत्या होताना पाहिली. मुंबई विमानतळावरच्या एन्काउंटरनंतर महमूदचा मृतदेह तातडीने तिथून घेऊन जाण्यात आला होता. तिने महमूदचा खूप शोध घेतला. शेवटी तिला कुणीतरी माहिती दिली की, जे जे हॉस्पिटलच्या शवागृहात तिच्या पतीचा मृतदेह आहे. त्यानुसार ती तिथे गेली. पतीचा मृतदेह पाहून तिने हंबरडा फोडला. मृत पतीचा हात हातात घेऊन ती ढसाढसा रडू लागली.

अशरफला पतीच्या हत्येचं गूढ समजलं

महमूदला कब्रस्तानात अलविदा करुन अशरफ नातेवाईकांसोबत घरी परतत असताना तिला एक वृद्ध भेटला. त्याने आपलं स्वत:चे नाव उस्मान असं सांगितलं. त्याने महमूद कालिया काय काम करायचा? ते सांगितलं. तसेच त्याची हत्या कुण्याच्या इशाऱ्याने झाली याची कल्पना अशरफला दिली. दाऊदच्या सांगण्यावरुन त्याचा एन्काउंटर घडवण्यात आल्याचा दावा त्याने केला. हे ऐकून अशरफ प्रचंड संतापली. दाऊदचा सूड घेण्याची भावना तिच्या मनात आली.

उस्मानने अशरफला हुसेन उस्तराची दिली माहिती

उस्मानने यावेळी अशरफला या कामासाठी हुसेन उस्तरा मदत करु शकेल, अशी कल्पना दिली. त्यानुसार अशरफ हुसेन उस्तराच्या भेटीला गेली. तिने आपल्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती हुसेन उत्सराला दिली. तसेच आपल्याला दाऊदचा बदला घ्यायचा आहे, असं तिने सांगितलं. सुरुवातीला हुसेनला अशरफच्या बोलण्यावर हसू आलं. पण अशरफ भावनिक होऊन बोलत असल्याने मदतीचं आश्वासन दिलं.

हुसेन उस्तरा कोण होता?

हुसेन उत्सरा हा दाऊद इब्राहिमचा शत्रूच होता. त्याची टोळी डी-कंपनीच्या विरोधात काम करायची. तसेच तो पोलिसांचा खबऱ्या म्हणूनही काम करायचा. दाऊदचे जुगारी अड्डे, खंडणी उकळणे, डान्सबार, नाइट क्लब यांच्या विरोधात अचूक माहिती हुसेन उस्तरा पोलिसांना द्यायचा. त्यातून त्याला इनाम म्हणून काही रक्कम देखील मिळायची. तसेच त्याची स्वत:ची एक टोळी होती. ही टोळी दाऊदच्या विरोधात काम करायची.

उस्तरा नाव कसं पडलं?

हुसेन उस्तरा हा सुरुवातीला पाकिटमार होता. त्याने तरुणपणात पाकिट मारल्यानंतर त्याला भरपूर पैसे मिळाले होते. पण त्यांच्या पाकिटमार टोळीचा जो दादा होता त्याला त्याने अपुरे पैसे दिले होते. याची खबर त्यांच्या टोळीच्या दादाला कुणीतरी दिली. त्यावरुन त्या दादाने हुसेनला मारहाण केली. यावेळी हुसेनने त्याला खिशातला वस्तरा काढला आणि त्याच्यावर हल्ला केला. त्याने वस्तराने केलेल्या अचूक माऱ्यावरुन त्याचे नाव गुन्हेगारी विश्वात उस्तरा असं पडलं.

हुसेन उस्तराने दिलं अशरफला प्रशिक्षण

हुसेनने अशरफला त्याच्या इमारतीच्या बेसमेटमध्ये गन कशी चालवायची? याचं प्रशिक्षण दिलं. तसेच मार्शल आर्टचं देखील प्रशिक्षण दिलं. त्याच्या तालमीत अशरफ ही बेधडक बनली. तिने स्वसंरक्षणासाठी काय-काय करायला हवं ते सर्व शिकून घेतलं. अनेक आठवडे तिने उस्तराकडून प्रशिक्षण घेतलं.

अशरफ डॉन अरुण गवळीला भेटली

दरम्यान, हुसेनने अशरफला डॉन अरुण गवळी याच्याकडे पाठवलं होतं. त्या काळात अरुण गवळी हा दाऊद इब्राहिमचा विरोधातला मोठा आणि ताकदवान डॉन होता. अशरफने अरुण गवळीची भेट घेतली. तिने आपली व्यथा अरुण गवळीला सांगितली आणि मदतीची याचना केली. अरुण गवळीने तिच्या पतीच्या मृत्यूवर सहानुभूती व्यक्त केली. पण तिला मदत करण्यास अरुण गवळीने साफ नकार दिला. यामुळे अशरफ नाराज झाली.

अशरफने नाव बदललं, सपना ठेवलं

अरुण गवळीच्या भेटीनंतर अशरफने आपले नाव बदलून घेतले. सपना हे नाव हिंदू आणि मुस्लीम दोन्ही समाजात असतं. त्यामुळे आपलं नाव ऐकून आपल्याला कुणी मदत करणार नाही, असं होणार नाही, अशी समजूत तिने स्वत:च्या मनाला घातली. अशरफने स्वत:चं नाव सपना केल्यानंतर तिच्यामध्ये कमालीचा बदल झाला. बुरखा आणि सलवार कमीजमध्ये राहणारी अशरफ नंतर जिन्स पॅन्ट आणि शर्टवर राहू लागली. बाईकवर मुंबईत फिरायला लागली. ती हळूहळू गुन्हेगारी जगतात लेडी डॉन सपना दिदी म्हणून प्रसिद्ध झाली.

सपनाने दाऊदचा माल अनेकदा पकडवून दिला

हुसेन उस्तराने अशरफ उर्फ सपनाला आपल्या खबऱ्यांसोबत ओळख करुन दिली होती. त्या माध्यमातून तिने आपलं जाळं उभारत आपली टोळी उभी करण्यास सुरुवात केली. ती दाऊदच्या दोन नंबरच्या मालाची माहिती पोलिसांना द्यायची आणि माल पकडून देण्यात पोलिसांना मदत करायची. विशेष म्हणजे ती अज्ञात स्थळावरुन फोन करुन पोलिसांना खबर द्यायची. त्यामुळे तिचं नाव यामध्ये यायचं नाही.

Sapna Didi

दाऊदचे शस्त्रास्त्रे लुटले

पुढे उस्तरा आणि सपना हे नेपाळमध्ये गेले होते. तिथे देखील दाऊद इब्राहिमचे शस्त्र आणि इतर तस्करीचा सामाना लुटत त्यांनी दाऊदला धक्का दिला होता. तिथे काही जीवघेणे प्रसंग घडले आणि त्यातून दाऊदला जास्त तोटा देता येत नसल्याचं लक्षात आल्यानंतर दोघांनी मुंबईतच दाऊदच्या विरोधात काम करायचं ठरवलं.

उस्तरा आणि सपना यांच्यात ताटातूट

हुसेन उस्तरा आणि सपना मिळून आपल्याविरोधात काम करत असल्याची खबर दाऊदला लागली होती. त्यामुळे एकदा दाऊदची माणसं हे सपनाच्या मागे लागली. यावेळी सपना मदतीसाठी उस्तराकडे गेली. यावेळी उस्तराने सपनासोबत गैरवर्तन केलं. यामुळे दोघांमध्ये वाद झाला. यानंतर सपना कधीच उस्तराला भेटली नाही.

सपनाने स्वत:ची गँग बनवली, दाऊदला मारण्याचा कट

सपना दिदीने मग स्वत:ची टोळी मोठी केली. तिने दाऊद इब्राहिमला मारण्याचा कट आखला. त्यावेळी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना पाहण्यासाठी दाऊदची हजेरी असायची अशी माहिती सपनाला मिळाली होती. त्यामुळे शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये तिच्या माणसांनी रेकी केली होती.

दाऊद नेमका कुठे बसतो, कुठून कसा चालत जातो, याची सर्व माहिती मिळवली होती. त्या अनुषंगाने सपनाने पूर्ण स्टेडियमचा आराखडा तयार केला होता. सपना ही देखील तिथे जाणार होती. पण त्याआधीच तिच्या टोळीतला एक जण फुटला. त्याने दाऊदच्या माणसांना माहिती दिली. यामुळे संतापलेल्या छोटा शकीलने तिला संपवण्याचा विडा उचलला.

छोटा शकीलच्या माणसांनी सपनाला निर्घृणपणे संपवलं

सपना 1994 मध्ये डोंगरीतल्या हुजरा मोहोल्यामध्ये राहायला गेली होती. त्यादिवशी ती आजारी होती. तिला ताप आल्याने रात्री दहाच्या सुमारास ती आपल्या घरात झोपली होती. सपना एकटी घरात झोपल्याची माहिती छोटा शकीलपर्यंत पोहोचली. अचानक हुजरा मोहल्लामध्ये एक व्हॅन आली. व्हॅनमधून गन आणि चाकूधारी काही माणसं उतरली. त्यांनी सपनाच्या घराचा दरवाजा तोडला आणि तिच्यावर अमानुष हल्ला केला. या हल्ल्यात ती मरण पावली.

पतीचा हत्येचा बदला घेण्यासाठी अशरफ सपना झाली होती. या दरम्यान हुसेन उस्तरासोबत वाद झाल्यानंतर तिने वेगळी टोळी तयार केली होती. याच काळात तिने एका पोलीस अधिकाऱ्यासोबत दुसरं लग्न केलं होतं. पण ते फार काळ टिकलं नव्हतं. तिने दाऊद इब्राहिमला अनेकदा मोठमोठे धक्के दिले होते. दाऊदचा बदला घेण्यासाठी तिने अतोनात प्रयत्न केले. पण अखेर 1994 मध्ये दाऊदच्या माणसांनी तिला निर्घृणपणे संपवलं.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा