मुंबई, दि. ६: ज्येष्ठ साहित्यिक, ‘डोह’कार श्रीनिवास विनायक कुलकर्णी (श्री.वि.) यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वातील एक संवेदनशील, अभ्यासू आणि व्रतस्थ साहित्यिक हरपल्याची शोक भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. शोकसंदेशात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणतात, श्री.वि. कुलकर्णी यांनी आपल्या सूक्ष्म निरीक्षणशक्ती, निसर्गप्रेम आणि जीवनातील साध्या अनुभवांना असामान्य साहित्यिक अभिव्यक्ती देत मराठी ललित साहित्य समृद्ध केले.
डोह, मनातल्या उन्हात, सोन्याचा पिंपळ, पाण्याचे पंख आणि कोरडी भिक्षा यांसारख्या साहित्यकृतींनी मराठी वाचकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला. ‘मौज’ या प्रतिष्ठित नियतकालिकाचे संपादक म्हणून त्यांनी अनेक नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आणि मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेला नवे आयाम दिले. साहित्यावरील त्यांची निष्ठा, संवेदनशीलता आणि साधेपणा भावी पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहील.
श्री.वि. कुलकर्णी यांच्या निधनाने मराठी साहित्य क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली असल्याची शोक भावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
0000
