मुंबई दि. १८: ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, समाजप्रबोधक आणि परिवर्तनवादी चळवळीतील अग्रणी व्यक्तिमत्त्व डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने सामाजिक बांधिलकीचा वारसा जपणारे ऋषितुल्य असे व्यक्तिमत्व आज आपल्यातून गेले अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री म्हणतात की, डॉ. कुमार सप्तर्षी यांनी आयुष्यभर समाजातील वंचित, दुर्बल आणि उपेक्षित घटकांच्या प्रश्नांसाठी निष्ठेने आवाज उठवला. गांधीवादी विचारसरणीच्या माध्यमातून सामाजिक समता, लोकशाही मूल्ये आणि मानवी संवेदनांचा आग्रह त्यांनी सातत्याने जपला. समाजाला विधायक दिशा देणाऱ्या त्यांच्या वैचारिक योगदानामुळे अनेक पिढ्यांतील युवक सामाजिक कार्याकडे प्रेरित झाले.
ग्रामीण भागातील विकास, शिक्षणाचा प्रसार, सामाजिक प्रबोधन आणि परिवर्तनवादी चळवळीला त्यांनी दिलेली बौद्धिक दिशा ही महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील महत्त्वाची नोंद राहील. विचारांशी प्रामाणिक राहून समाजहितासाठी अखंड झटणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांसाठी प्रेरणादायी होते, असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणतात की, डॉ. सप्तर्षी यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक अभ्यासू विचारवंत, संवेदनशील समाजनेता आणि मूल्यनिष्ठ कार्यकर्ता गमावला आहे. त्यांचे कार्य, विचार आणि सामाजिक बांधिलकीचा वारसा पुढील पिढ्यांना सतत मार्गदर्शन करत राहील.
०००
