जालना शहरातील प्रस्तावित विपश्यना केंद्राच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असून आजी-माजी आमदारांमध्ये शाब्दिक चकमक रंगली आहे. आमदार अर्जुन खोतकर आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी एकमेकांवर जोरदार टीका करत आरोप-प्रत्यारोप केले आहेत. या प्रकल्पासाठी आपण शासनाकडून तब्बल 130 कोटी रुपयांची मंजुरी मिळवून दिली आहे. मात्र या प्रकल्पाला माजी आमदार गोरंट्याल यांनी विरोध दर्शविल्याचा आरोप खोतकर यांनी केला आहे. तर जिथे विपश्यना केंद्र होणार आहे, ती जागा शासकीय असून अद्याप महापालिकेकडे हस्तांतरण झालेली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी आणि पर्यावरण प्रदूषण मंडळचे ना हरकत प्रमाणपत्र त्यासाठी आवश्यक आहे. जेव्हा ती जागा मिळेल तेव्हाच तिथे प्रत्यक्ष कार्यवाही सुरू होईल. त्यामुळे आमदाराला यातील काहीही कळत नसून त्यांना अधिक अभ्यास करण्याची गरज असल्याची टीका माजी आमदार गोरंट्याल यांनी केली.