• Mon. Jul 13th, 2026

    महिलांच्या सुरक्षितता व सक्षमीकरणासाठी ‘सखी वन स्टॉप सेंटर’ अधिक सक्षम करण्याचे निर्देश – मंत्री आदिती तटकरे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 13, 2026
    महिलांच्या सुरक्षितता व सक्षमीकरणासाठी ‘सखी वन स्टॉप सेंटर’ अधिक सक्षम करण्याचे निर्देश – मंत्री आदिती तटकरे – महासंवाद

    मुंबई, दि. १३ : राज्यातील महिलांच्या सुरक्षितता, संरक्षण व सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या यंत्रणा अधिक सक्षम व परिणामकारक करण्याच्या दृष्टीने महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी  मुंबईतील विविध संस्थांना भेट देऊन कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी महिला व बालविकास आयुक्त जगदीश मिनियार, विभागीय उपायुक्त सुवर्णा पवार तसेच गिरासे उपस्थित होते.

    सर्वप्रथम मंत्री तटकरे यांनी केईएम, रुग्णालयातील ‘सखी वन स्टॉप सेंटर’ला भेट देऊन तेथील सेवा व सुविधांची पाहणी केली. हिंसाग्रस्त आणि संकटग्रस्त महिलांना तातडीने, सन्मानपूर्वक व दर्जेदार सेवा मिळाव्यात, यासाठी केंद्रातील भौतिक सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करून दुरुस्तीची कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

    त्यानंतर त्यांनी कामा व अल्बलेस रुग्णालयातील नव्याने उभारण्यात आलेल्या ‘सखी वन स्टॉप सेंटर’ची पाहणी केली. केंद्राचे सर्व काम पूर्ण झाले असून १ ऑगस्ट २०२६ पर्यंत हे केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच केंद्रातील रिक्त पदे तातडीने भरून आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितांना सूचना करण्यात आल्या. त्यानुसार १ ऑगस्टपूर्वी सर्व रिक्त पदे भरण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

    यानंतर मंत्री तटकरे यांनी महिला विकास मंडळ, कुलाबा येथील नोकरी करणाऱ्या महिलांच्या वसतिगृहाला भेट देऊन तेथील सुविधा, सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता व निवास व्यवस्थेची पाहणी केली. वसतिगृहातील एकूण व्यवस्था समाधानकारक असल्याचे त्यांनी नमूद करत, रहिवासी महिलांना अधिक दर्जेदार व सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

    यावेळी मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, महिलांच्या सुरक्षितता, संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. ‘सखी वन स्टॉप सेंटर’ तसेच कार्यरत महिलांच्या वसतिगृहांमार्फत महिलांना अधिक प्रभावी, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्यावर शासनाचा भर राहील.

    ०००

    श्रद्धा मेश्राम/विसंअ

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed