• Sun. Jul 12th, 2026
    पाऊसधारा सरल्या, घामाच्या धारा परतल्या; मुंबई परिसरात तापमान 32 पार, पुढच्या आठवड्यात काय स्थिती?

    IMD Weather Alert : पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबई आणि परिसरातील वातावरणात आर्द्रता वाढली आहे. येत्या आठवड्यात पारा ३३ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुसळधार पावसाच्या अमृतधारांमध्ये न्हाऊन निघालेल्या मुंबईकरांना आता घामाच्या धारा भिजवू लागल्या आहेत. पाऊस विसावल्यानंतर तापमानाचा पारा चढायला सुरुवात झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून उकाडा वाढला आहे. शुक्रवारी कुलाबा आणि सांताक्रूझ या दोन्ही केंद्रांवर ३२ अंश सेल्सिअसहून अधिक तापमानाची नोंद झाली.

    पावसाची विश्रांती, आर्द्रता वाढली

    आठवड्याच्या सुरुवातीला मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, रायगड, पालघर परिसराला तुफान पावसाने झोडपून काढले. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबई आणि परिसरातील वातावरणात आर्द्रता वाढली आहे. येत्या आठवड्यात पारा ३३ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

    मुंबईमध्ये गुरुवारी सकाळी ८.३० ते शुक्रवारी सकाळी ८.३० या कालावधीत कुलाबा येथे ०.८, तर सांताक्रूझ येथे ०.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या दोन दिवसांमध्ये फारसा पाऊस नसल्याने आता सरासरीमध्येही फारशी वाढ झालेली नाही. कुलाबा येथे १ जूनपासून १० जुलैपर्यंत १३८७.२, तर सांताक्रूझ येथे १५६३ मिलीमीटर एकूण पावसाची नोंद झाली आहे.
    Maharashtra TimesPrithviraj Chavan : फडणवीस केंद्रात, भाजपात विलीन करुन शिंदेंना मुख्यमंत्रिपद देणार, अशा चर्चा ऐकल्यात, पृथ्वीराज चव्हाणांचं विधान चर्चेत

    महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढला

    कोकण विभागातही तापमान चढू लागले आहे. डहाणू आणि अलिबाग या दोन्ही केंद्रांवर ३३.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. अलिबाग केंद्रावर सरासरीपेक्षा ३.३ अंशांनी, तर डहाणू केंद्रावर २.७ अंशांनी कमाल तापमानात वाढ झाल्याची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी, तर विदर्भात बऱ्याच केंद्रांवर कमाल तापमानात पुन्हा वाढ नोंदवली गेली. मध्य महाराष्ट्रात सोलापूर येथे ३५.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची शुक्रवारी नोंद झाली. तर, विदर्भामध्ये राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. चंद्रपूर येथे पारा ३६ अंशांच्या पार पोहोचला आहे. हे तापमान सरासरीपेक्षा ४ अंशांनी अधिक होते.

    अतिवृष्टीचा मिठागरांना फटका

    दरम्यान, रायगड जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवस झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून समुद्राला आलेले उधाण, खाड्यांमधील भरती आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे मिठागरांनाही मोठा फटका बसला.

    Devendra Fadnavis यांनी Raj Thackeray यांना Mimicry Artist म्हणत छेडलं, Missing Link चा पेटला

    या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका पेण तालुक्यातील खारेपाट भागातील शिर्की भागात बसला. या भागात अजूनही सुमारे दीडशे एकर क्षेत्रावर समुद्राचे खारे पाणी वापरून नैसर्गिक पद्धतीने शुभ्र मिठाचे उत्पादन घेतले जाते. वर्षभर शेकडो कामगारांच्या मेहनतीने तयार झालेले सुमारे दोन हजार टन मीठ विक्रीसाठी प्लास्टिक आच्छादनाखाली साठवून ठेवण्यात आले होते.

    मुसळधार पाऊस, समुद्राचे उधाण, खाडीतील वाढलेली पाणीपातळी आणि तुटलेल्या बांधांमुळे पाणी मिठागरात शिरले. परिणामी मिठाच्या राशी भिजून उत्पादनाचे मोठे नुकसान झाले. संस्थेच्या शासकीय भात खरेदी केंद्रात साठवून ठेवलेला सुमारे बारा हजार टन भातही भिजल्याचे सांगण्यात येते.
    Maharashtra Times2029 मध्ये देशभरात एकाच वेळी निवडणूक? One Nation One Election ला जोर, अंतिम आराखड्यासाठी प्रयत्न
    मुसळधार पावसाच्या अमृतधारांमध्ये न्हाऊन निघालेल्या मुंबईकरांना आता घामाच्या धारा भिजवू लागल्यामुळे पुन्हा पाऊस कधी जोर धरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा