• Thu. Jul 9th, 2026

    Pratap Sarnaik : उद्धव आणि आदित्य ठाकरे आले तर त्यांचे स्वागत करु, प्रताप सरनाईक यांचं मोठं वक्तव्य

    Pratap Sarnaik : उद्धव आणि आदित्य ठाकरे आले तर त्यांचे स्वागत करु, प्रताप सरनाईक यांचं मोठं वक्तव्य

    राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. उद्धव आणि आदित्य ठाकरे आले तर त्यांचे स्वागत करु, असं प्रताप सरनाईक म्हणाले आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे बुधवारी (8 जुलै) विधीमंडळात एका बैठकीसाठी गेले होते. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर आयोजित बैठकीसाठी ते विधान भवनात दाखल झाले. या बैठकीनंतर शरद पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात गेले. पवार आपल्या दालनात आल्याची माहिती मिळताच एकनाथ शिंदे कॅबिनेट बैठक सोडून आपल्या दालनात आले. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन शरद पवारांचे स्वागत केले. त्यानंतर ते पुन्हा बैठकीसाठी निघून गेले. यानंतर शरद पवारांनी आपल्या आमदारांची बैठक याच दालनात घेतली. यावरुन मविआत मतभेद होताना दिसत आहेत.

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. अशामुळे शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होत असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. संजय राऊतांच्या या वक्तव्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दलही मोठं वक्तव्य केलं.

    प्रताप सरनाईक यांचं सूचक वक्तव्य

    “मला एक कळत नाही की, प्रत्येक गोष्टीमुळे संजय राऊत यांच्या पोटात का दुखत असतं? आमच्या गाड्यांमधून आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे आले तरी त्याचं आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो. त्यामुळे मित्र आणि शत्रू हे तुम्ही ओळखा”, असं सूचक वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केलं.

    राऊतांवर सरनाईक काय म्हणाले?

    “संजय राऊत कुणावही शंका उपस्थित करतात. आजपर्यंत ज्या शरद पवारांचे गुणगाण गात होता, त्यांचा राजकारणात 60 वर्षांचा इतिहास आहे. शरद पवारांनी कधी कुणाला दुखावलं नाही. बेळगावच्या प्रश्नावर चर्चा होती. शरद पवार विधीमंडळात आले”, असं प्रताप सरनाईक म्हणाले.

    पवारांना शिंदेंबद्दल आपुलकी, सरनाईकांचा दावा

    “शरद पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले. आपल्याबरोबर काही आमदारांसोबत चर्चा करायची होती तर एकनाथ शिंदे यांच्या कॅबिनमध्ये आले. कारण त्यांना वाटलं की हे कॅबिन आपले आहे. आपल्या सहकारी नेत्याचं आहे. आपले सहकारी नेते म्हणून महाराष्ट्राच्या विधान भवनात काम करत आहेत. एका नेत्याला दुसऱ्या नेत्याबद्दल आपुलकी असते. तशी शरद पवारांना एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आपुलकी आहे”, असा दावा प्रताप सरनाईक यांनी केला.

    ‘ज्येष्ठ नेत्यांच्या सन्मानाची आमची भूमिका’

    “शरद पवारांना एकनाथ शिंदे यांनी कॅबिनमध्ये बोलावलेलं नाही. एकनाथ शिंदे यांच्या कॅबिनमध्ये शरद पवार स्वत:हून आपुलकीने आले. शरद पवार आपल्या कॅबिनमध्ये आले हे कळल्यानंतर एकनाथ शिंदे कॅबिनेट बैठक सोडून पाच मिनिटांसाठी आले. त्यांनी शरद पवारांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. कारण राजकारणात ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान करण्याची भूमिका आमच्या नेत्यांची आहे”, असं प्रताप सरनाईक म्हणाले.

    ‘ठाकरेचंही स्वागत करणार’

    उद्या उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे आले तर त्यांचं स्वागत करणार का? असा प्रश्न पत्रकाराने विचारला. त्यावर त्यांनी “हो स्वागत आहे, असं उत्तर दिलं. प्रत्येकाचं स्वागत करायचं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे”, असं प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं.

    शिंदे-ठाकरे एकत्र येतील का?

    एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का? असा प्रश्न प्रताप सरनाईक यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “कल्पना नाही. हे काळच ठरवेल. पण मी पुन्हा सांगतो की, राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो”, अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली.

    बाईक-टॅक्सीच्या प्रश्वावर सरनाईक काय म्हणाले?

    “सर्वसामान्य प्रवाशांना सुविधा मिळाव्यात या हेतूने परिवहन विभागाने टू-व्हिलर बाईक टॅक्सीला परवानगी द्यावी, अशी विनंती करण्यात आली होती. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी टू विल्हर बाईक टॅक्सी ही केवळ ईलेक्ट्रॉनिक राहाव्यात, असा निर्णय दिला. त्यानंतर आम्ही तशी सुरुवात केली.”

    “सुरुवात केल्यानंतर ओला, उबर, रॅपिडो या कंपन्यांनी आमच्याकडे मागणी केली. त्यामुळे त्यांना एक महिन्यांसाठी तात्पुरता मान्यता दिली. पण त्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली नाही. त्यामुळे एक महिन्यांनी त्यांचे परवाने रद्द करण्यात आले. त्यानंतर त्यांनी पेट्रोल बाईक रस्त्यावर आणल्या. स्वत:च्या अॅपमध्ये त्यांनी लोकांना संधी दिली. मागच्या सहा महिन्यात चार ते साडेचार लाख रस्त्यावर आले.”

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा