Thane-Navi Mumbai Travel: ऐरोली येथील एनएच-4 ते डोंबिवलीतील काटई नाका यांना जोडणाऱ्या प्रस्तावित एलिव्हेटेड रोडची 2028ची डेडलाइन चुकण्याची शक्यता आहे. एमएमआरडीएने या पुलाचे कंत्राट ऑक्टोबर 2024मध्ये दिले होते तरी दीड वर्षांनंतर अद्याप भूसंपादन पूर्ण झालेले नाही.
प्रवास अवघ्या 10 मिनिटांत
नवी मुंबईतील रबाळे, ऐरोली परिसरातून वाहनचालकांना कल्याण-डोंबिवलीच्या दिशेने प्रवास करण्यासाठी प्रामुख्याने शीळफाटा-महापे मार्गाने वळण घेऊन प्रवास करावा लागतो. त्यामुळे मुंबई आणि नवी मुंबईतून बदलापूच्या दिशेने प्रवास करताना होणारा द्राविडी प्राणायाम टाळण्यासाठी ऐरोली-काटई नाका उन्नत आणि भूमीगत अशा दोन्ही पद्धतीने सहापदरी रस्त्याची निर्मिती एमएमआरडीएच्या माध्यमातून केली जात आहे. शिळफाट्यावरील वाहतूककोंडी दूर करून ऐरोली ते काटईपर्यंतचा प्रवास अवघ्या १० मिनिटांमध्ये पूर्ण करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. हा मार्ग नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर येथील वाहतूक सुधारण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
Navi Mumbai News: ऐरोली-काटई नाका मार्गाचा दुसरा टप्पा पूर्ण, शिळफाट्यावरील वाहतूककोंडी फुटणार; ठाणे-नवी मुंबई प्रवासात वेळ वाचणार
तसेच, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लवकर पोहोचण्यासाठीही या मार्गाचे महत्त्व वाढणार आहे. प्रकल्पाच्या पहिल्या दोन टप्प्याची कामे सुरू असतानाच ऑक्टोबर २०२४ मध्ये या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यातील कामाला मंजुरी मिळाली होती. त्यानंतर १२ महिन्यांत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन प्रकल्पाचे काम सुरू होण्याची आवश्यकता होती. परंतु या प्रकल्पाचे कंत्राट देऊन १७ महिन्यांनंतरही अपेक्षित भूसंपादन प्रकिया पूर्ण झाली नसल्याने या प्रकल्पाच्या कामामध्ये अडथळा निर्माण झाल्याची कबुली एमएमआरडीएकडून देण्यात आली आहे.
ठाणे महापालिकेच्यावतीने जिल्हा प्रशासनाच्या वतीने या प्रकल्पासाठी भूसंपादन केले जात असून साधारण सप्टेंबर २०२६पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ती पूर्ण झाल्यानंतर कामे सुरू होऊन उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्यास नियोजित डेडलाइनपेक्षा एक वर्षापेक्षा अधिक काळ लागण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
प्रत्यक्ष कामाला चार महिने
जमीन संपादन पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदाराला काम सुरू करण्यासाठी किमान चार महिने लागतील. या कालावधीत भू-तांत्रिक तपासणी, माती परीक्षण, आराखडे तयार करणे आणि आवश्यक असल्यास युटिलिटी स्थलांतराची कामे केली जातील. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्ष बांधकाम सुरू होऊ शकते. पावसाळा जवळ येत असल्याने जमीन संपादन प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करणे अत्यावश्यक असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
भूसंपादन प्रक्रिया सुरू
या प्रकल्पासाठी कौसा, डोनकर, डवळे, शीळ, देसाई आणि कटाई या सहा गावांमध्ये भूसंपादन करावे लागणार आहे. या वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये संयुक्त मोजमाप सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. एका गावासाठी मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, उर्वरित पाच गावांसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Navi Mumbai News: नवी मुंबईतील स्थानकांचा तिढा कायम; ‘सिडको’कडून मध्य रेल्वेकडे ताबा देणार, रेल्वे प्रवाशांची गैरसोय कायम राहणार
असा आहे उन्नत मार्ग…
६.७ किमी लांबीच्या या उड्डाणपुलामध्ये ६ किमीचा व्हायाडक्ट, भारतीय रेल्वे, आणि डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन (डीएफसीसीआयएल) मार्गावर १०० मीटरचा रेल्वे ओव्हरब्रिज (आरओबी), १.५८ किमी रॅम्प आणि ६.३२ किमी सेवा रस्ते यांचा समावेश आहे.
