• Sun. Jul 5th, 2026

    राज्यपालांची समूह विद्यापीठांच्या कुलगुरुंसोबत बैठक – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 13, 2026
    राज्यपालांची समूह विद्यापीठांच्या कुलगुरुंसोबत बैठक – महासंवाद

    मुंबई, दि. १३ : महाराष्ट्रातील केवळ एक – दोन विद्यापीठांना आज राष्ट्रीय मानांकनात स्थान आहे. हे चित्र बदलले पाहिजे. राज्यातील समूह विद्यापीठे नवीन असली तरीही त्यांच्याशी संलग्न महाविद्यालये जुनी व नामांकित आहेत. त्यामुळे या विद्यापीठांनी राष्ट्रीय विद्यापीठ मानांकनामध्ये आपले मानांकन सुधारण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे अशी सूचना  राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी सोमवारी राज्यातील समूह विद्यापीठांना केली.

    राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील चार समूह विद्यापीठांची लोकभवन मुंबई येथे आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.

    बैठकीला एचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ हेमलता बागला, डॉ होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. राजनीश कामत, सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्रोव्होस्ट चंद्रकांत दळवी व कुलगुरु डॉ ज्ञानदेव म्हस्के तसेच वारणानगर येथील वारणा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ डी टी शिर्के तसेच विद्यापीठांचे अधिकारी उपस्थित होते.

    विकसित भारताचे लक्ष्य गाठताना क्षयरोगाचे समूळ उच्चाटन झाले पाहिजे असे सांगून समूह विद्यापीठांनी टीबी मुक्त भारत अभियानात विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. यासाठी विद्यापीठांनी विद्यार्थ्यांसाठी पोस्टर स्पर्धा घ्यावी, मराठी व हिंदी भाषेत जिंगल्स स्पर्धा तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम घ्यावे अशीही सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

    यावेळी विद्यापीठांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम, सर्वोत्तम प्रथा, संशोधन प्रकल्प, कौशल्य अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांची नावनोंदणी, वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी, देशविदेशातील विद्यापीठांसोबत सुरु असलेले सहकार्य आदी विषयांची राज्यपालांना माहिती दिली.

    0000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed