• Mon. Jun 15th, 2026

    दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा टर्निंग पॉइंट

    ByMH LIVE NEWS

    Apr 5, 2026
    दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा टर्निंग पॉइंट

    आयपीएल 2026 स्पर्धेच्या आठव्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघ भिडले. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली. मुंबई इंडियन्सला 6 गडी राखून पराभूत केलं आणि गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं आहे. या सामन्यात समीर रिझवी आणि पाथुम निस्संका यांनी केलेल्या जबरदस्त खेळीने विजय सोपा झाला. मुंबई इंडियन्सच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली आणि 20 षटकात 162 धावांपर्यंत मजल मारली. तसेच दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी 163 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सला सुरूवातीला दोन धक्के बसले. अवघ्या 7 धावांवर दिल्ली कॅपिटल्सने दोन विकेट गमावले. केएल राहुल आणि नितीश राणा स्वस्तात बाद झाल्याने दिल्ली कॅपिटल्सवर दबाव वाढला. पण पाथुम निस्संका आणि समीर रिझवी यांनी डाव सावधपणे पुढे नेला. 10 षटकात दिल्ली कॅपिटल्सची स्थिती 73 धावावर 3 विकेट अशी झाली. त्यामुळे पुढे दबाव वाढणार हे निश्चित होतं, पण 11 व्या सामन्यात चित्र पालटलं.

    11व्या षटकात टर्निंग पॉइंट

    मुंबई इंडियन्सने विजयासाठी 163 धावा दिल्या होत्या. पण 10 व्या षटकापर्यंत मुंबई इंडियन्सने बरोबरीने लढत दिली. दिल्ली कॅपिटल्स अडचणीत आल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने 11वं षटक कॉर्बिन बॉसच्या हाती सोपवलं. हे षटक दिल्लीच्या विजयाचं कारण ठरलं. कारण या षटकात 2 चौकार आणि 2 षटकार आले. त्यामुळे 20 धावा आल्या आणि संघावरील दडपण कमी झालं. 11व्या षटकात धावसंख्या थेट 93 धावांवर पोहोचली. कॉर्बिन बॉसच्या या चार चेंडूमुळे मुंबई इंडियन्सच्या हातून सामना वाळूसारखा निसटत गेला. समीर रिझवीची 51 चेंडूत 90 धावांची खेळी महत्त्वाची ठरली. त्याने 7 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 90 धावा केल्या.

    समीर रिझवी काय म्हणाला?

    विजयानंतर समीर रिझवीने आपल्या खेळीबाबत महत्त्वाचे पैलू उघड केले. समीर रिझवी म्हणाला की, ‘मी नेहमी परिस्थितीनुसार खेळण्याचा प्रयत्न करतो. जर परिस्थिती बदलत असेल, तर मी दोन्ही डावांमध्ये त्यानुसार खेळलो. सुरुवातीला, आमच्या परिस्थितीला थोडा वेळ आवश्यक होता, म्हणून मी माझा वेळ घेतला. मग, परिस्थितीनुसार, एकदा मी खेळपट्टीवर स्थिरावल्यावर, मी माझे फटके खेळलो आणि अगदी शेवटपर्यंत चेंडू पाहण्याचा प्रयत्न केला. ‘ समीर रिझवीने पुढे सांगितलं की, ‘मी जेव्हा कधी अशा परिस्थितीत फलंदाजीला येतो, तेव्हा थोडा वेळ घेण्याचा प्रयत्न करतो कारण वेळेनुसार तुम्ही खेळपट्टीवर स्थिरावता. एकदा तुम्ही स्थिरावलात की, तुम्हाला परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजते आणि तुम्ही त्यानुसार खेळू शकता. मग पुढे काय करायचं याचा जास्त दबाव जाणवत नाही. एकदा तुम्ही स्थिरावलात की फलंदाजी सोपी होऊन जाते.’

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed