वसईत पैशांच्या वादातून मित्रानेच मित्राचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अशोक राजपूत यांचा शिरच्छेद करून पुरावे लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेने परिसर हादरला आहे.
किराणा व्यवसायातील वादातून टोकाचे पाऊल
या प्रकरणातील मृत व्यक्तीचे नाव अशोकसिंग करमसिंग राजपूत (वय ३२) असून ते मूळचे राजस्थानमधील पाली येथील रहिवासी होते. या प्रकरणात पोलिसांनी मदनसिंग चुडावत (२६) आणि विक्रमसिंग चुडावत (३२) या दोघांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक राजपूत आणि आरोपी यांच्यात किराणा मालाच्या व्यवसायातील पैशांच्या देवाणघेवाणीवरून तीव्र वाद झाला होता. या वादाचे रूपांतर संतापात होऊन आरोपींनी अत्यंत थरारक कट रचला.
अत्यंत क्रूरपणे हत्येचा बनाव
आरोपींनी अशोक यांना विश्वासात घेऊन बोलावले आणि प्रथम बांबूच्या काठीने मारहाण केली. त्यानंतर धारदार शस्त्राने त्यांचा शिरच्छेद केला. ओळख पटू नये म्हणून मृतदेहावर चाकूने अनेक वारही करण्यात आले. गुन्हा लपवण्यासाठी आरोपींनी मृतदेहाचे धड पेल्हार (सोपारा फाटा) परिसरातील झुडपात टाकले, तर शिर आणि मोबाईल फोन शिरसाड फाटा येथील नदीत फेकून दिला. या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे सुरुवातीला तपासात अनेक अडथळे निर्माण झाले होते.
Shiv Sena Leader Arrested : पोलिसांना चकवा देत 10 वर्ष राजकारणात सक्रिय; शिवसेनेचा बडा नेता अखेर अटकेत
पोलिसांची हायटेक कारवाई आणि अटक
घटनेची माहिती मिळताच वसई पोलीस ठाणे आणि मीरा-भाईंदर वसई-विरार (MBVV) गुन्हे शाखेने तात्काळ तपास सुरू केला. केवळ ८ तासांच्या आत तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज, श्वान पथक, ड्रोन आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने आरोपींचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. तपासादरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या माहितीवरून पोलिसांनी शिरसाड फाटा येथील नदीतून मृताचे शिर आणि मोबाईल जप्त केला आहे. हे पुरावे या प्रकरणात अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
न्यायालयीन कारवाई आणि तपास
या प्रकरणात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १०३(१) (हत्या) आणि कलम २३८ (पुरावा नष्ट करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या पोलिसांकडून हत्येसाठी वापरलेले शस्त्र आणि बांबूची काठी जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच मृतदेहाचे नमुने फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आले असून, हत्येची अचूक वेळ आणि पद्धत सिद्ध करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
Ashok Kharat Son : कंपाऊडवरुन उडी मारून बंगल्यात प्रवेश, अशोक खरातच्या मुलाला फिल्मी स्टाईल अटक; बायको फरार
मैत्रीचे नाते रक्ताने माखले
या घटनेमुळे “मित्रावर विश्वास ठेवला, पण त्याच्याच हातून मृत्यू झाला” ही कटू सत्यता पुन्हा एकदा समोर आली आहे. पैशांच्या वादातून मैत्रीचे नाते वैरात बदलून त्याचा शेवट रक्तरंजित झाला, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. वसईतील या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला असून, अशा घटनांमुळे समाजात असुरक्षिततेची भावना वाढत आहे.
