• Fri. Jun 12th, 2026

     वाशीत २४ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत’महालक्ष्मी सरस २०२६’चे आयोजन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 23, 2026
     वाशीत २४ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत’महालक्ष्मी सरस २०२६’चे आयोजन – महासंवाद

    मुंबई, दि. २३ : ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा आणि त्यांच्यातील कलागुणांचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या उमेद अभियानामार्फत आयोजित ‘महालक्ष्मी सरस २०२६’ या प्रदर्शन नवी मुंबईतील वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे २४ मार्च ते ४ एप्रिल २०२६ या कालावधीत सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून ते विनामुल्य असणार आहे.

    या प्रदर्शनाचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे राज्यातील दुर्गम भागातून आलेल्या महिला बचत गटांच्या  ग्रामीण भगिनींच्या कौशल्यपूर्ण आणि दर्जेदार उत्पादनांना राज्यस्तरीय व्यापक बाजारपेठेत विक्रीची संधी प्राप्त होते. या महिलांनी आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने तयार केल्याल्या या उत्पादनांना नेहमीच मोठ्या प्रमाणात ग्राहकांची पसंती मिळत आली आहे.

    राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी नागरिकांनी या  प्रदर्शनाला आर्वजून भेट देऊन महिला बचत गटांच्या कौशल्यपूर्ण दर्जैदार उत्पादनांना प्रोत्साहन देत ग्रामीण महिलांच्या  कष्टकरी प्रवासाला साथ देण्याचे आवाहन केले आहे.

    प्रदर्शनात एकूण ४९० स्टॉल्सचा समावेश

    यावर्षीचे प्रदर्शन अधिक भव्य आणि सुसज्ज करण्यात आले असून, यामध्ये एकूण ४९० स्टॉल्सचा समावेश आहे. खवय्यांसाठी विशेष आकर्षण म्हणजे यात १०० फूड स्टॉल्स लावण्यात आले आहेत, जिथे अस्सल ग्रामीण चवीच्या पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. त्याचसोबत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह इतर राज्यांतून आलेल्या कारागिरांचे वैविध्यपूर्ण स्टॉल्सही आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.

    वातानुकूलित महालक्ष्मी सरस प्रदर्शन

    नागरिकांच्या सोयीसाठी प्रदर्शनाचे संपूर्ण क्षेत्र पूर्णतः वातानुकूलित आहे. ग्रामीण महिलांच्या पारंपारिक कौशल्याला जागतिक दर्जा मिळावा यासाठी या प्रदर्शनात उच्च दर्जाचे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक मार्केटिंग पद्धतींचा वापर करण्यात आला आहे. डिजिटल व्यवहार आणि नाविन्यपूर्ण सादरीकरणामुळे ग्रामीण महिलांची उत्पादने आजच्या आधुनिक युगाशी स्पर्धा करण्यासाठी सज्ज झाली आहेत.

    मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटले आहे की, बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला आज स्वावलंबी होत आहेत. इतर राज्यांतील आणि महाराष्ट्रातील या भगिनींच्या उत्पादनांची खरेदी करून  कष्टकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी आणण्यासाठी मुंबई आणि नवी मुंबईतील नागरिकांनी मोठ्या संख्येने महालक्ष्मी सरस प्रर्दशनास आर्वजून भेट द्यावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री गोरे यांनी केले आहे.

    ००००

    वंदना थोरात/विसंअ

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed