• Wed. Mar 11th, 2026
    Kolhapur News: 5 वर्षांचा चिमुकला घराबाहेर पडला; नंतर सीसीटीव्ही फुटेज पाहून कुटुंबाच्या काळजाचा ठोका चुकला, कोल्हापुरात हळहळ!

    साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर: कोल्हापूर महापालिकेच्या दुर्लक्षामुळे एका बालकाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापुरात बांधकामासाठी बांधलेल्या एका पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून एका पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूरच्या जवाहरनगरमधील सरनाईक वसाहतीत ही घटना घडलीय. या अपघातात 5 वर्षीय इजान अक्रम बारगीर या बालकाचा बुधवारी दुपारी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तब्बल आठ वर्षांपासून बुजवल्या नसलेल्या या खड्ड्यामुळे निष्पाप बालकाचा जीव गेल्याने कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. महापालिका आणि कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली असून, राजारामपुरी पोलिस तपास करत आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील जवाहरनगर सरनाईक वसाहत, 5 वी गल्ली येथे अक्रम बारगीर, त्यांची पत्नी आणि दोन मुले राहतात. इजान हा एकुलता एक मुलगा असून, त्याचे वडील वखारीत काम करतात. बुधवारी दुपारी साडेतीन वाजता इजान खेळण्यासाठी घराबाहेर पडला. उशीर झाल्यानंतरही तो घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यान, तौसिफ पटवेगार, वसीम पटेल आणि मोहसीन मुल्ला यांनी जवळील मशीदेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले, ज्यात इजान मशीदेकडे गेला असल्याचे दिसले. कुटुंबीयांनी राजारामपुरी पोलिसांत तक्रारही नोंदवली.

    साडेसहा वाजता पुन्हा सीसीटीव्ही तपासात इजान मशीदीपासून पुढे गेल्याचे दिसले, पण दुसऱ्या कॅमेऱ्यात तो दिसला नाही. यानंतर तौसिफ आणि इतरांनी जवळील 20 फूट खोल खड्ड्यात शोध घेतला. पाण्यावरील हिरवा शेवाळ दूर केल्यावर इजानचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला.

    आठ वर्षे जुना धोकादायक खड्डा
    नागरिकांच्या मते, सात-आठ वर्षांपूर्वी अपार्टमेंट बांधकामासाठी खोदलेला हा खड्डा 260 चौरस फूट रुंद, 40 फूट लांब आणि 20 फूट खोल आहे. महापालिकेच्या 40 फूट डीपी रोडमुळे काम थांबले, पण खड्डा मुजवला गेला नाही. पावसाळ्यात पाणी साचून शेवाळाने झाकलेले असल्याने तो धोकादायक बनला आहे. नागरिकांनी निवेदने दिली, उपोषणही केले, तरी महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे. या खड्ड्यावरून महापालिका आणि कंत्राटदारांमध्ये वाद सुरू आहे.

    तब्बल 600 विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
    या खड्ड्याजवळच उर्दू शाळा असून, तेथे 600 विद्यार्थी शिकतात. शाळेतील विद्यार्थ्यांची या खड्ड्यामार्गे ये-जा होते. इजानच्या मृत्यूनंतर नागरिकांनी महापालिकेला इशारा दिला की, आता तरी खड्डा मुजवा, अन्यथा मोठी दुर्घटना घडेल. “महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप बालकाचा बळी गेला. सदोष मनुष्यहत्या होणार का?” असा संतप्त प्रश्न परिसरातील रहिवाशांनी उपस्थित केला आहे.

    दरम्यान, या घटनेने कोल्हापूर शहरात हळहळ व्यक्त होत असून, प्रशासनाने तातडीने खड्डा बुजवावा, अशी मागणी होत आहे. तर पोलिसांकडून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed