• Mon. Jun 29th, 2026

    ‘हिंद-दी-चादर’ शहीदी समागम कार्यक्रमांची व्यापक स्वरुपात जनजागृती करावी – जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Feb 11, 2026
    ‘हिंद-दी-चादर’ शहीदी समागम कार्यक्रमांची व्यापक स्वरुपात जनजागृती करावी – जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते – महासंवाद

    धुळे, दि. 11 (जिमाका) : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमाचा कार्यक्रम 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी नवी मुंबईतील खारघर येथे होत आहे. यानिमित्त धुळे जिल्ह्यात या कार्यक्रमांची व्यापक स्वरुपात जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिले.

    ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात  जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस आमदार मंजुळा गावित, अनुपभैय्या अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत साबळे, तहसीलदार साहेबराव सोनवणे, अरुण शेवाळे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी मोहनलाल वाडीले, समिती सदस्य जयवंत पवार, डॉ. साईदास चव्हाण, सुरेश कुंदनाणी, नवलसिंग पवार, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

    जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते म्हणाल्या की, ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर सहिबजी यांचा 350 वी शहीदी समागम शताब्दी महोत्सव मुंबईतील खारघर येथे आयोजित करण्यात आला आहे. या 350 व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिर्मित्त श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा गौरवशाली इतिहास सर्वांना माहित व्हावा, तसेच त्यांनी केलेला प्रचार व दिलेले बलिदान यांचे स्मरण होण्याकरिता जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयामध्ये श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या जीवन कार्यावर आधारित गीत गायन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, व्याख्याने, प्रभात फेरीचे आयोजन करावे.

    परिवहन व महामंडळाने कार्यक्रमांस जाणाऱ्या भाविकांसाठी वाहनाची व्यवस्था करावी. प्रत्येक गावात, तांडा वस्त्यावर कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी करावी. जिल्ह्यात दररोज होणाऱ्या कार्यक्रमांचे छायाचित्र वेबसाईटवर अपलोड करावे. शाळा महाविद्यालयात सतिंदर सरताजचे गाणे व श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे जीवनकार्य क्लिप विद्यार्थ्यांना दाखविण्यात यावी. कार्यक्रमांस स्थानिक लोकप्रतिनिधीना आंमत्रित करण्यात यावे. नऊ समाजातील समाज बांधवांनी समाजात व्यापक प्रचार प्रसिद्धी करावी. नऊ समाजाच्या नियमित बैठका घ्याव्यात.

    सतिंदर सरताज यांचे भक्तिगीत सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात येत आहे. जिल्ह्यांमध्ये जाहिरात फलक, डिजिटल प्रचार रथ, संत प्रवास वाहने, जागरण, प्रचार व प्रसार समित्या यांच्यामार्फत गुरू तेग बहादुर आणि त्यांच्या परिवाराच्या शहीदीचा इतिहास जनमानसात पोहोचविण्यात याव्यात तसेच व्यापक स्तरावर जनजागृती करावी. या सर्व उपक्रमांची माहिती नियमितपणे सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी यावेळी दिले.

    000

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed