मुंबई
महामुंबईतील महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जाणारे ठाणे आता मुंबई उपनगरी रेल्वेवरील प्रवासी मृत्यूंचे केंद्र ठरू लागले आहे. गेल्या चार वर्षांपासून मुंबई उपनगरी रेल्वेवर सर्वाधिक मृत्यू ठाणे रेल्वे स्थानक परिसरातच नोंदवले आहेत. अपुऱ्या लोकलफेऱ्या, लोकलना होणारा विलंब त्यामुळे प्रवाशांचा लटकून होणारा जीवघेणा प्रवास, वर्षानुवर्षे रखडलेल्या प्रकल्पांमुळे सर्वसामान्यांची गैरसोय यांमुळे गर्दीसह आता मृत्यूचे ‘ठाणे’ अशी शहराची ओळख होऊ लागली आहे.
कशामुळे लोकलला विलंब?
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण/कसारा/कर्जत या मुख्य मार्गांवरील लोकल सातत्याने विलंबाने धावत आहेत. एसी लोकलच्या अयोग्य नियोजनामुळे मुख्य मार्गावरील वेळापत्रकाचा बोजवारा उडाला आहे. विलंबाने येणाऱ्या लोकलमध्ये प्रवाशांची तुडुंब गर्दी होते. अनेकदा ऐनवेळी लोकल निश्चित फलाटाऐवजी अन्य फलाटावर येते. त्यामुळे प्रवासी लोकल पकडण्यासाठी जीव धोक्यात घालून रुळांवर उड्या घेत फलाट ओलांडतात.
ठाणे स्थानकावरील सर्वाधिक अपघात रेल्वे रुळ ओलांडणे आणि धावत्या लोकलमधून पडून झाले आहेत. सन २०२५मध्ये रुळ ओलांडताना १२५ पुरुष आणि १९ महिलांचा मृत्यू झाला. धावत्या लोकलमधून पडून ६० पुरुष आणि सहा महिलांनी जीव गमावला. विशेष म्हणजे, सन २०२२ ते २०२५ दरम्यान सर्वाधिक मृत्यूंची नोंद होत असतानाही ठोस उपाययोजना राबवण्यात यंत्रणा सपशेल अपयशी ठरली. स्थानकातील चोरवाटा बंद करणे, रुळ ओलांडण्यासाठी उपाययोजना करणे, लोकल वेळेत चालवणे याबाबत रेल्वे पोलिसांकडून रेल्वे सुरक्षा दल आणि मध्य रेल्वेला पत्रव्यवहार करण्यात आला आहे, असे रेल्वे पोलिसांचे म्हणणे आहे.
या प्रकल्पांचे काय झाले?
ठाणे स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी नोव्हेंबर 2016मध्ये कळवा-ऐरोली उन्नत मार्गिका प्रकल्पा मंजूर करण्यात आला. यामुळे कल्याणवरून थेट ऐरोली लोकल धावणर. 2017मध्ये ठाणे-मुलुंडदरम्यान नवे स्थानक उभारण्याची घोषणा झाली. तसेच ठाणे स्थानकाचा पुनर्विकैस करून मल्टी-मोडाल ट्रान्झिट हब उभारण्याची योजना सुद्धा आहे. मात्र पुनर्विकास केव्हा पूर्ण होणार, प्रवाशांचा जीव केव्हा वाचणार याबाबत रेल्वे प्रशासनाकडे उत्तर नाही.