• Sun. Mar 8th, 2026

    Sunetra Pawar : यशवंतरावांनी वेणूताईंचं स्मारक कसं उभारलं? श्रीनिवास पाटलांनी सुनेत्रा पवारांना सांगितली ‘ती’ गोष्ट

    Sunetra Pawar : यशवंतरावांनी वेणूताईंचं स्मारक कसं उभारलं? श्रीनिवास पाटलांनी सुनेत्रा पवारांना सांगितली ‘ती’ गोष्ट

    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नुकताच सातारा जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी कराड येथील प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन केलं. तसेच त्यांनी वेणूताई चव्हाण स्मारक ट्रस्टलादेखील भेट दिली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुधीर पाटील, सातारा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या पहिल्याच कराड दौऱ्यात प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळी अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी वेणूताई चव्हाण स्मारक ट्रस्टला देखील भेट दिली. वेणूताईंचे स्मारक उभारण्यामागील कारण आणि यशवंतरावांनी स्मारक कसं उभारलं, त्याची गोष्ट माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना सांगितली.

    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार प्रीतिसंगमावरून थेट वेणूताई चव्हाण स्मारकात आल्या. स्मारकातील ग्रंथालय आणि संग्रहालयाची पाहणी करून बाहेर पडत असताना माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी त्यांना यशवंतरावांचे इच्छापत्र दाखवले. हे स्मारक उभारण्यासाठी यशवंतरावांनी जमीन विकली आणि वेणूताईंचे दागिने मोडले होते, अशी माहिती दिली. यशवंतराव आणि वेणूताई यांना आदर्श दाम्पत्य का म्हणतात? याची प्रचिती सुनेत्रा पवार यांना त्यावेळी आली.

    संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना त्यांच्या सार्वजनिक जीवनात पत्नी वेणूताईंची अनमोल साथ लाभली होती. त्याबद्दच्या आठवणी पत्राच्या माध्यमातून सांगितलेल्या आहेत. वेणूताईंच्या निधनानंतर यशवंतराव चव्हाण यांनी सार्वजनिक न्यास (Public Trust) स्थापन करून वेणूताईंचे स्मारक उभारण्याचा संकल्प केला होता.
    Maharashtra TimesSunetra Pawar : सर्वात मोठी बातमी! उपमुख्यमंत्रीपदानंतर आता सुनेत्रा पवार यांच्यावर आणखी महत्त्वाची जबाबदारी
    यशवंतरावांनी आपल्या सहकाऱ्यांना लिहिलेल्या इच्छापत्रात म्हटले होते की, पत्नीची आठवण चिरंतन राहावी, हा उरलेला माझ्या जीवनातील एकच आनंद आहे. त्यादृष्टीने माझ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. माझ्या कराड गावी एखादी जमीन विकत घेऊन त्यावर एखादी वास्तू बांधावी. त्या वास्तूत माझ्या ग्रंथालयातील अनमोल ग्रंथ ठेवावेत. अनेक व्यक्ती आणि संस्थांनी मला प्रेमाने भेट दिलेल्या वस्तुंचेही संग्रहालयाच्या माध्यमातून जतन व्हावे, अशी माझी इच्छा आहे. ग्रंथालय आणि संग्रहालय हे माझ्या पत्नीची स्मृती म्हणून त्याच्या दैनंदिन जपणुकीची योजना करावी, असा संकल्प असल्याचेही त्यांनी इच्छापत्रात नमूद केले होते.
    Maharashtra TimesBMC Mayor Election : अखेर सस्पेन्स संपला? मुंबई महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीबाबत सर्वात मोठी अपडेट
    वेणूताईंचे दागिने मोडून, तसेच पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन गावातील शेतजमीन विकून मिळालेल्या पैशातून कराडमध्ये स्मारकासाठी शंभर वर्षांच्या लीजवर जागा घेतली. त्या जागेवर स्मारकाचे काम सुरू केले होते. मात्र, काही काळातच यशवंतराव चव्हाण यांचे निधन झाले. त्यानंतर शरद पवार यांच्या सूचनेनुसार माजी आमदार दिवंगत पी. डी. पाटील यांनी वेणूताईंच्या स्मारकाचे काम पूर्ण करून घेत यशवंतरावांची इच्छापूर्ती केली होती.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा