• Wed. Jul 1st, 2026

    शिवसैनिक काय असतो हे विसरलात का?; एकनाथ भाईंसाठी शिंदे सेना कडाडली! गणेश नाईकांच्या ‘त्या’ विधानाचा घेतला समाचार

    ByMH LIVE NEWS

    Jan 26, 2026
    शिवसैनिक काय असतो हे विसरलात का?; एकनाथ भाईंसाठी शिंदे सेना कडाडली! गणेश नाईकांच्या ‘त्या’ विधानाचा घेतला समाचार

    मुंबई
     राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत असले तरी, अंतर्गत वादाचे फटाके आता उघडपणे फुटू लागले आहेत. भाजप नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या बोचऱ्या टीकेमुळे शिवसेनेच्या (शिंदे गट) गोटात तीव्र संताप व्यक्त होत आहे. “भाजपने परवानगी दिली, तर त्यांचे नामोनिशाण संपवून टाकू,” या नाईकांच्या आव्हानाला आता उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी सडेतोड उत्तर दिले असून, नवी मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

    काय म्हणाले शंभुराज देसाई?

    गणेश नाईकांच्या आव्हानावर पत्रकारांशी बोलताना शंभुराज देसाई यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली. ते म्हणाले की, “राजकारणात कोणीच कोणाला कमी समजू नये. एखाद्याला संपवण्याची भाषा जर कोणी करत असेल, तर समोरचे काही हाताची घडी घालून बसलेले नाहीत. आम्हालाही राजकारण कळते. जर आमच्या नेतृत्वावर अशी टीका झाली, तर वेळ आल्यावर आम्ही सुद्धा आमची भूमिका घेऊ आणि आमचा पक्ष नाईकांना तोडीस तोड उत्तर देईल.”शंभुराज देसाईंनंतर आता शिवसेनेचे युवा आमदार, मंत्री योगेश कदम यांनी नाईकांना थेट शिंगावर घेतले आहे. “गणेश नाईक स्वतः मूळचे शिवसैनिक आहेत, त्यामुळे शिवसैनिक काय करू शकतो हे त्यांना वेगळे सांगण्याची गरज नाही,” अशा शब्दांत कदमांनी नाईकांना जुन्या आठवणींची आणि शिवसैनिक स्टाईलची आठवण करून दिली आहे.

    नंदुरबार दौऱ्यावर असलेल्या योगेश कदम यांनी गणेश नाईकांच्या विधानावर तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले, “एक महानगरपालिका म्हणजे काय संपूर्ण महाराष्ट्र होत नाही. एका शहराचे राजकारण पाहून त्यांनी एवढी मोठी विधाने करू नयेत. गणेश नाईक यांनी आता स्वतःच्या भाषेवर आणि वागण्यावर आवर घातला पाहिजे.”

    गणेश नाईकांच्या विधानावर बोलताना संजय शिरसाट यांचा पारा चढला. ते म्हणाले, “गणेश नाईकांचं जरा जास्तच व्हायला लागलंय. नामोनिशाण मिटवायला हे काय नवी मुंबईचे डोंगर आहेत का? आम्ही जिद्दीने उभे राहणारे लोक आहोत. एकनाथ शिंदेंमुळे तुम्ही आज सत्तेत आहात, हे विसरू नका. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काय आदेश घ्यायचे ते घ्या, पण वारंवार अशा वल्गना करून तुम्ही मोठे होत नाही.”

    शिरसाट पुढे म्हणाले की, “आम्ही महायुतीचा धर्म पाळतोय याचा अर्थ असा नाही की आम्हाला काही कळत नाही. आमचा त्याग आहे म्हणून आज ही सत्ता आहे. शिंदेंना हलक्यात घेण्याची चूक करू नका, यावर मी स्वतः फडणवीसांशी बोलणार आहे.”

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed