• Fri. Mar 13th, 2026

    Praniti Shinde: ‘दोन पावले मागे हटलो ते पुढच्या झेपेसाठीच’; महापालिकेतील पराभवानंतर प्रणिती शिंदेंचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

    Praniti Shinde: ‘दोन पावले मागे हटलो ते पुढच्या झेपेसाठीच’; महापालिकेतील पराभवानंतर प्रणिती शिंदेंचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

    सोलापूर महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर खा. प्रणिती शिंदे यांचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सोलापूर: सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या निकालानंतर कार्यकर्त्यांमध्ये पसरलेली मरगळ झटकण्यासाठी आणि त्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी एक अत्यंत भावनिक पत्र लिहिले आहे. “हा पराभव वेदनादायक आहे, पण तो अंतिम नाही,” अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला आहे.

    संर्घष आकड्यांत उतरला नाही!

    प्रणिती शिंदे यांनी पत्राची सुरुवात अत्यंत प्रांजळपणे केली आहे. त्या म्हणतात, “महानगरपालिका निवडणुकीचे निकाल आपल्या अपेक्षांप्रमाणे लागले नाहीत, हे सत्य आपल्याला स्वीकारावे लागेल. कार्यकर्त्यांनी अनेक महिने रस्त्यावर उतरून संघर्ष केला, घरोघरी जाऊन पक्षाचा विचार पोहोचवला. मात्र, ही मेहनत आज आकड्यांमध्ये रूपांतरित होऊ शकली नाही, याची खंत आहे.” त्यांनी या पराभवाचे खापर सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर फोडताना म्हटले की, आपण बलाढ्य धनशक्ती, सत्तेचा दुरुपयोग, यंत्रणांचा गैरवापर आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या अत्यंत कठीण परिस्थितीत ही निवडणूक लढलो आहोत.

    ‘दोन पावले मागे, कारण…’

    कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी पत्रात लिहिले आहे की, “राजकारणात जय-पराजय येत-जात असतात. मात्र, तुमची निष्ठा आणि प्रामाणिकपणा हीच आपली खरी शिदोरी आहे. तुम्ही ज्या जिद्दीने काम केले, ते कुठेही वाया गेलेले नाही.”

    Maharashtra TimesBeed Accident: बीडमध्ये पोलीस व्हॅनच्या धडकेत जखमी झालेल्या अमोल हांडगे यांचा मृत्यू, ज्ञानराधा बँकेच्या आरोपींना घेऊन जाणाऱ्या गाडीने दिली होती धडक

    आपल्या पत्राचा समारोप करताना त्यांनी शेर मांडत कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश भरला. त्यांनी लिहिले, “झुकना हमारी फितरत नहीं, दो कदम पीछे हटे हैं पर सिर्फ अगली छलांग लगाने के लिए!” म्हणजेच आपण मागे हटलो आहोत ते केवळ भविष्यातील मोठ्या झेपेसाठी, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    आता वेळ आत्मपरीक्षणाची!

    पराभवावर चिंतन करण्याची गरज व्यक्त करताना प्रणिती शिंदे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की, ही वेळ खचून जाण्याची नाही तर आत्मपरीक्षणाची आहे. लोकांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत, बदलणारे सामाजिक वास्तव काय आहे आणि धनशक्तीचा सामना कसा करायचा, यावर आपल्याला आता गांभीर्याने विचार करावा लागेल. “आज आपण थोडं थांबू, श्वास घेऊ आणि उद्याच्या लढाईसाठी अधिक सज्ज होऊ,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

    त्यांच्या या पत्राची सोलापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून, कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा