• Fri. Mar 6th, 2026
    Mumbai Crime: मुंबईत मद्य, मादक पदार्थांचा महापूर! निवडणूक काळात 45 कोटींचे अमली पदार्थ जप्त, 29 जणांवर गुन्हे दाखल

    Mumbai Crime: मुंबई पोलिसांनी ३६ बंदूक, ११५ धारदार शस्त्र आणि ५२ दारुगोळाही हस्तगत केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २ हजार ४५० गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईही केली आहे.

    mumbai drugs cases(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : महापालिका निवडणूक काळात मुंबईत ४५ कोटी ९५ लाख रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. तर ३ कोटी १० लाख १७ हजार रुपये रोख रक्कमही जप्त केल्याची माहिती मुंबई महापालिकेने सोमवारी दिली. याशिवाय मोठ्या प्रमाणात मद्य जप्तीही केली आहे. निवडणुकीच्या कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी २९ जणांवर अदखलपात्र आणि दखलपात्र गुन्हेही दाखल केले आहे.

    मुंबईत ८ लाख ३ हजार ३३० रुपये किंमतीचे १ हजार २३७ लिटर मद्य जप्त करण्यात आले आहे. तर ५५ किलोग्रॅमचे अमली पदार्थही जप्त करण्यात आले आहेत. याची किंमत ४४ कोटी ९५ लाख ७ हजार २३७ रुपये आहे. निवडणूक काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैशाचा वापरही सर्रासपणे होतो. अशावेळी सर्तक राहिलेल्या निवडणूक अधिकारी, पोलिसांनी ३ कोटी १० लाख १७ हजार रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. निवडणुकीशी संबंधित १६ अदखलपात्र गुन्हे आणि दखलपात्र १३ गुन्ह्यांची अशी एकूण २९ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
    Maharashtra TimesMumbai Local: ट्रेनला लटकून प्रवास, अचानक हात सटकला अन् अनर्थ; धावत्या लोकलमध्ये क्षणात होत्याचं नव्हतं
    आचारसंहिता भंगाच्या तक्रारी
    महापालिका निवडणुकीत आचारसंहिता उल्लंघन होत असल्याचे दिसताच त्याविरोधात राजकीय पक्षांचे उमेदवार, कार्यकर्ते, स्थानिक रहिवाशी एकमेकांविरोधात तक्रार करतात. असाच तक्रारीचा सूर निवडणूक आदर्श आचार संहिता कक्षाकडे लावण्यात आला आहे. मुंबईत १० जानेवारीपर्यंत आचारसंहिता भंगाच्या एकूण ३८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये बॅनर, पोस्टरबाबत जास्त तक्रारी आहेत. मालाड परिसर असलेल्या पी उत्तर वॉर्डमध्ये पाच तक्रारी, बांद्रा ते सांताक्रुझ पूर्व भाग असलेल्या एच पूर्वमधून चार तक्रारी यासह अन्य वॉर्डमधूनही तक्रारी आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

    Maharashtra TimesBMC election: महापौर मराठीच! शिवाजी पार्कवरील महायुतीच्या सभेत फडणवीस, शिंदे यांची ग्वाही
    झेंडे, जाहिरात फलकांवरही कारवाई
    महापालिका निवडणुकांची आचारसंहिता लागताच मुंबई महापालिकेकडून अनधिकृत फलकांवर कारवाई करण्यात येत आहे. आचारसंहिता कालावधीत एकूण ७ हजार ६५१ जाहिरात फलकांवर कारवाई केली आहे. तर १ हजार ६०१ झेंडे काढून जप्त केले आहेत.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा