मनसे नेत्याच्या हत्या प्रकरणामुळे सोलापुरात खळबळ उडाली आहे. राजकीय नेत्यांच्या आरोपांमुळे चर्चेला उधाण आले असून पोलिसांची कारवाई सुरू आहे. नेमकं काय घडतंय?
प्रभाग 2 मधील भाजपचा पॅनल बिनविरोध करण्यासाठी विजयकुमार देशमुख आणि त्यांच्या मुलाने मोठा दबाव निर्माण केला होता, त्यांच्यामुळेच मनसे नेता बाळासाहेब सरवदे याचा खून झाला. मनसे नेते प्रशांत इंगळे खून झाल्यापासून भाजप आमदार विजयकुमार देशमुख आणि डॉ. किरण देशमुख यांच्यावर आरोप करत आहेत. त्यात आता माजी आमदार नरसय्या आडम यांनी थेट पोलिस आयुक्तांना भेटून कारवाईची मागणी केली आहे. प्रशांत इंगळे आणि नरसय्या आडम यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना भाजप आमदार अन् त्यांच्या मुलावर गंभीर आरोप केले आहेत.
मनसेचे नेते पोलिस ठाण्यात
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांचा शुक्रवारी सायंकाळी पावणेपाच वाजण्याचा सुमारास खून झाला. खाजगी रुग्णालयात त्यांना मृत घोषित केल्यानंतर मनसे नेते प्रशांत इंगळे यांनी ताबडतोब रुग्णालयासमोर माध्यमांना प्रतिक्रिया देत थेट विजयकुमार देशमुख आणि प्रभाग 2 मधील उमेदवार व भाजप आमदार यांचे चिरंजीव डॉ. किरण देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. रात्री उशीरापर्यंत जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मनसेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जेलरोड पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. मृत बाळासाहेब सरवदे यांचे भाऊ बाजीराव सरवदे यांनी फिर्याद दिली, आणि 15 संशयित आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पण प्रशांत इंगळेंनी सांगितल्याप्रमाणे भाजपच्या कुठल्याही मोठ्या नेत्यावर गुन्हा दाखल झाला नाही.
Akola Election: अजब टॉसची चर्चाच चर्चा; ‘ईश्वर चिठ्ठी’ उघडली अन् एमआयएमचा उमेदवार थेट निवडणुकीच्या रिंगणाबाहेर
माजी आमदार पोलिस आयुक्त कार्यालयात
माजी आमदार नरसय्या आडम खा. प्रणिती शिंदे तसेच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या राज्य उपनेत्या अस्मिता गायकवाड, शिवसेना जिल्हाध्यक्ष अजय दासरी, काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी पोलिस आयुक्त एम राजकुमार यांची भेट घेतली. आयुक्तांना भेटून आल्यानंतर माजी आमदार व माकप नेते नरसय्या आडम यांनी थेट विजयकुमार देशमुख आणि त्यांचा मुलगा डॉ किरण देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे.
पोलिस आयुक्त एम राजकुमार यांची प्रतिक्रिया
सोलापूर शहराचे पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले, मृत बाळासाहेब सरवदे यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार 15 संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे. यामधील 5 संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. मृत बाळासाहेब खून प्रकरणात आम्ही कसून तपास करत आहोत, फिर्यादीनुसार रेखा सरवदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. विरोधी पक्षातील लोकांनी जल्लोष साजरा करताना वाद झाला आणि त्यामधून खून झाला.
मृतकाचे सख्खे भाऊ बाजीराव सरवदे हे घटनास्थळी होते, त्यांची फिर्याद आम्ही लिहून घेतली आहे, त्यामध्ये कुठेही भाजपमधील मोठ्या नेत्यांची नावे नाहीत, मृतकाचे भावाने दिलेल्या फिर्यादी वरून पोलिस कारवाई सुरू आहे, अशी प्रतिक्रिया आयुक्तांनी दिली आहे.
