Kolhapur Accident : राज्यात अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. असाच एक भीषण अपघात कोल्हापुरातील चुये फाट्याजवळ झाला आहे. या भीषण अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मुलाच्या प्रवेश चौकशीदरम्यान अपघात
कोल्हापूर-गारगोटी मार्गावरील चुये (ता. करवीर) फाट्याजवळ काल शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. शिवाजी शंकर कोळी (वय 45, रा. कागल, मूळ नानीबाई चिखली, ता. कागल) हे पत्नी वैशाली आणि नात सुप्रिया यांना सोबत घेऊन दुचाकीवरून मुलाच्या प्रवेशासंदर्भात माहिती घेण्यासाठी गारगोटीकडे जात होते. चुये फाट्याजवळ त्यांनी रस्त्याची चौकशी करण्यासाठी एका हॉटेलबाहेर दुचाकी थांबवून पुढील मार्ग विचारला आणि तेथून काही अंतरावरच समोरून आलेल्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जबर धडक दिली. या धडकेत शिवाजी कोळी रस्त्यावर जोरात आपटल्याने जागीच ठार झाले, तर मागे बसलेल्या वैशाली कोळी आणि नात सुप्रिया रस्त्याच्या कडेला दूरवर फेकल्या गेल्याने गंभीर जखमी झाल्या. जखमींना तात्काळ नागरिकांच्या मदतीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वैशाली कोळी यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
मुंबई पोलिसांनी रिक्षा अडवल्या, भीम अनुयायांनी चुनाभट्टीजवळ 2 तास रस्ता रोखला, नेमकं काय घडलं?
कार चालकाचाही मृत्यू
अपघातातील दुसरा मृत अतुल अरविंद पाटील (वय 30/33, रा. गुडाळ, ता. राधानगरी) हा खासगी कारचालक असून तो गोकूळ शिरगाव एमआयडीसी परिसरातील पंचतारांकित औद्योगिक प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या तरुणांना घेऊन कागलकडे जात होता. कारमधील गजानन प्रभाकर चौगले (रा. तारळे), अनिल शिवाजी जाधव (रा. धामोड), विजय कृष्णांत पाटील (रा. गुडाळ), स्वप्निल बापूसाहेब पाटील (रा. ठिकपुर्ली), प्रेम संजय पाटील (रा. गुडाळ), दत्तात्रय पाटील (रा. आवळी खुर्द) आणि बाजीराव चरापले (रा. कौलव) असे आठ जण गंभीर जखमी झाले.
धडकेचा जोर इतका जबरदस्त होता की दुचाकी आणि कार दोन्हींचा अक्षरशः चक्काचूर झाला. अतुल पाटील यांना गंभीर अवस्थेत कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असताना रात्री आठच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. गावात एका विवाह सोहळ्याला उपस्थित राहून ते दुपारी थोडी विश्रांती घेऊन कामावर निघाले असताना हा अपघात घडल्यानं परिसरात शोककळा पसरली आहे.
Jamkhed Crime : पत्नी भाजपची उमेदवार, तरी संदीपचा नर्तिका दीपाली पाटीलमागे लग्नासाठी तगादा, नेमकं प्रकरण काय?
दोन कुटुंबांवर दुहेरी आघात
शिवाजी कोळी यांच्या घरची हलाखीची परिस्थिती पाहता दहावीपर्यंतच शिक्षण घेऊन शिवाजी कोळी यांनी एमआयडीसीमध्ये खासगी कंपनीत नोकरी सुरू केली होती आणि गेली तीन दशके ते या भागातच कार्यरत होते. चार महिन्यांपूर्वीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले असतानाच आता त्यांच्या मृत्यूने कोळी कुटुंबावर दुहेरी आघात झाला असून त्यांच्या मागे आई, पत्नी, तीन विवाहित मुली आणि दोन मुलगे असा परिवार आहे. तर अतुल पाटील यांचे दीड वर्षांपूर्वीच लग्न झाले असून त्यांच्या अकाली निधनाने गुडाळ गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मागे पत्नी, आई-वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.
अपघाताची माहिती मिळताच इस्पुर्ली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुदस्सर शेख आणि पथकाने घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले असून पुढील तपास सुरू आहे.
