Leopard Attack: पारनेर तालुक्यातील किन्ही गावात शेतात खुरपणी करणाऱ्या ६५ वर्षीय भागूबाई खोडदे यांच्यावर बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार केले. वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
सदर महिला हरभऱ्याच्या शेतात काम करण्यासाठी मंगळवारी, 2 डिसेंबरला, दुपारी गेल्या होत्या. त्या शेतात त्यावेळी एकट्या होत्या. त्यावेळी त्यांच्यावर अचानक बिबट्याने हल्ला केला आणि त्यांना फरपटत नेले. शेजारच्या शेतात त्यांचे पती होते. त्यांनी लगेच आरडोओरड करून मदत मागितली. परंतू, मदत येई पर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
वडिलांसोबत शेतात गेली, बांधावर उभी; अचानक बिबट्याचा झडप अन्… 9 वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत
ग्रामस्थांचा वन विभागावर आक्रोश
किन्ही परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त वावर सुरू होता. गावकऱ्यांनी वन विभागाला पुन्हा पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी केली होती. मात्र, वेळेत प्रतिसाद न दिल्याचा आरोप ग्रामस्थांसह ग्रामपंचायत सदस्य अनिल देठे यांनी केला आहे.वन विभागाचा गलथान कारभार आणि त्याची किंमत एका वृद्ध महिलेला जीवाने चुकवली,असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला.
नरभक्षकला ठार मारण्याची मागणी
घटनेनंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत नरभक्षक बिबट्याला ठार करण्याची मागणी जोरात लावून धरली. पिंजरा लावला असला तरी त्या ठिकाणी भक्ष्य नसल्याने बिबट्या पिंजऱ्यात अडकत नाही, त्यामुळे संताप आणखी वाढला. जिल्हा उपवनसंरक्षकांनी नाशिकच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून बुधवार सकाळी 11 वाजेपर्यंत शार्प शूटर व आवश्यक आदेश देण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले.
तडजोडीसाठी सत्यजीत तांबेंचा श्रीकांत शिंदेंना फोन, मोठी मागणी; खताळांचा गौप्यस्फोट
किन्हीत भीतीचे सावट
या घटनेनंतर किन्ही आणि बहिरोबावाडी परिसरात भीतीचं सावट आहे. महिलांना आणि शेतकऱ्यांना एकटं शेतात जाण्याची भिती वाटू लागली आहे. आता वन विभागाने निर्णायक कारवाई न केल्यास ग्रामस्थ पुन्हा आंदोलनाला करण्याचा इशारा वन विभागाला दिला आहे.
