• Mon. Mar 16th, 2026
    Vishwas Nangare Patil : शांत स्वभाव अन् निस्वार्थ माया करणारे हात हरपले… विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक, ‘आज मन अत्यंत जड झालं…’

    Vishwas Nangare Patil Mother Death : मंगल नांगरे पाटील यांचा शांत स्वभाव, त्यांचे संस्कार आणि निस्वार्थ माया यासारख्या गुणांबद्दल सोशल मीडियावर भरभरुन लिहिण्यात आलं आहे.

    विश्वास नांगरे पाटील यांच्या मातोश्रींचे निधन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई/सांगली : महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक झाला आहे. धडाडीचे आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या मातोश्री श्रीमती मंगल नारायण नांगरे पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. सांगलीतील शिराळा मतदारसंघाचे आमदार सत्यजीत देशमुख यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून यासंदर्भात वृत्त दिले आहे.

    आमदार सत्यजीत देशमुख यांनी मंगल नांगरे पाटील यांचा शांत स्वभाव, त्यांचे संस्कार आणि निस्वार्थ माया यासारख्या गुणांबद्दल सोशल मीडियावर भरभरुन लिहिलं आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे, की ‘आज मन अत्यंत जड झालं आहे. आमच्या सर्वांच्या लाडक्या, माझे मित्र विश्वास नांगरे पाटील आणि विकास नांगरे पाटील यांच्या मातोश्री श्रीमती मंगल नांगरे पाटील आपल्यातून गेल्या.’

    सत्यजीत देशमुख यांनी पुढे लिहिलं की ‘सकाळपासून मन अस्वस्थ होते. मी शिराळ्याला गेलो आणि का माहिती नाही, पण वाटलं कोकरुडला जावं आणि मंगल काकींना भेटावं. मी तडक मागे फिरलो आणि परत कोकरुडला गेलो आणि थेट काकूंच्या घरी गेलो. काकींना डोळे भरून पाहिलं, त्यांची प्रकृती खूप खालावलेली, खूप काळजी वाटली. त्यांना पाहून आज मला माझ्या आईची खूप आठवण आली.’
    Maharashtra TimesRaigad News : 25 वर्षांनी सहा दोस्त कोकणात भेटले, मुंबईकर मित्रासोबत भयंकर घडलं, एकदा मृत्यूला चकवलं, पण रिक्षात…
    ‘मी परत शिराळ्याला गेलो आणि पाठोपाठ तीर्थरूप मंगल काकींची दुःखद बातमी समजली. खूप धक्का बसला. जसं काय शेवटचे त्यांना मला भेटायचे होते. अजूनही विश्वास बसत नाही. आई म्हणजे सर्वांचं मायेचं आभाळ असते, तिच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबाच्या हृदयात एक शून्य निर्माण होतो, असा शून्य जो शब्दांनी भरता येत नाही. काकींचा शांत स्वभाव, त्यांचे संस्कार, त्यांची निस्वार्थ माया…हे सगळं आयुष्यभर मला आठवणीत राहील.’ अशा भावना आमदार देशमुख यांनी व्यक्त केल्या आहेत.
    Maharashtra TimesPune News : माकडांची मस्ती मुंबईकर तरुणीला महागात, दगड घरंगळत येऊन डोक्यात पडला, राजगडावर भयंकर घटना

    ‘अशा माणसांचं जाणं म्हणजे फक्त निधन नाही— ती एक युगाची हळवी समाप्ती असते. ईश्वर त्यांच्या दिव्य आत्म्यास चिरशांती देवो.
    या कठीण प्रसंगातून कुटुंबाला धीर, आधार आणि सामर्थ्य मिळो—हीच मन:पूर्वक प्रार्थना’ अशा भावनाही सत्यजीत देशमुख यांनी मांडल्या आहेत.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा