• Mon. Mar 9th, 2026

    ‘आई स्वयंपाक करून ठेव’, म्हणत अक्षय घरातून गेला, तो पुन्हा परतलाच नाही, बेपत्ता तरुणाच्या शोधात मोठी माहिती समोर; महाराष्ट्र हादरला

    ‘आई स्वयंपाक करून ठेव’, म्हणत अक्षय घरातून गेला, तो पुन्हा परतलाच नाही,  बेपत्ता तरुणाच्या शोधात मोठी माहिती समोर; महाराष्ट्र हादरला

    Akola News : अकोल्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तीन दिवसांपासून आपला पोरगा बेपत्ता असल्यानं आई-वडिलांना चिंता लागली आहे. मात्र, पोलीस तपासात मोठी माहिती हाती लागली आहे. या घटनेनं संपूर्ण अकोला जिल्हा हादरला आहे.

    अकोला अक्षय नागलकर हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    प्रियंका जाधव, अकोला : अकोल्यातील डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा अक्षय नागलकर नावाचा तरुण बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. 22 ऑक्टोबरपासून बेपत्ता तरुण अक्षयचा शोध घेण्यात येत होता. मात्र, या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. अक्षय नागलकर याची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पूर्व वैमानस्यातून हे मोठं हत्याकांड घडलं आहे.

    गेल्या तीन दिवसांपासून अक्षयचे नातेवाईक आणि मित्रमंडळी दररोज डाबकी रोड पोलीस स्टेशनमध्ये येऊन ठाण मांडून बसतात. प्रत्येक वेळेस फक्त ‘तपास सुरू आहे’, एवढंच उत्तर त्यांना मिळत असल्यानं त्यांच्या मनात नाराजी आणि अस्वस्थता वाढली होती. या प्रकरणात स्थानिक भाजप पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अक्षयला शोधण्याची मागणी केली होती. ‘अक्षय जिवंत आहे की, त्याच्यावर काही अनर्थ ओढवला आहे. याचा तरी उलगडा लवकर करावा’, अशी आर्त मागणी अक्षयच्या वडिलांकडून केली जात होती. अखेर घडलं वाईटच. अक्षय नागलकर याची त्याच्या साथीदारांनीच हत्या केल्याचं धक्कादायक घटना समोर आली आहे. एकूण आठ जणांनी अक्षयची हत्या केली. तर पोलिसांनी यापैकी चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. हत्येचं कारण पोलिसांनी जुना वाद म्हणून सांगितलं आहे.

    Maharashtra Timesगडकरींसमोरच दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये जुंपली; एकीने दुसरीच्या अंगावर पाणी ओतलं, धक्का दिला अन्…; VIDEO झाला व्हायरल

    नेमकं काय घडलं?

    22 ऑक्टोबरच्या संध्याकाळी पाचच्या सुमारास अक्षयने आईला ‘स्वयंपाक करून ठेव’ एवढंच सांगितलं आणि तो घरातून बाहेर पडला. पण त्यानंतर तो कधीच परतला नाही. संपूर्ण कुटुंब दररोज त्याच दाराकडे पाहत होतं, कधी तरी तो येईल या आशेनं. मात्र, झालं उलटंच अक्षयची अतिशय निर्घृणपणे हत्या करून त्याचा मृतदेह जाळून टाकण्यात आला. अक्षय आणि मारेकरी यांनी हत्येपूर्वी आरोपीच्या एका हॉटेलमध्ये जेवण केलं. त्यानंतर अक्षयला चाकू भोसकून मारण्यात आलं. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने आरोपींनी अक्षयचा मृतदेह जाळून टाकला. अखेर या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर अक्षयची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं. याप्रकरणी आतापर्यंत चार जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत तर इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

    Maharashtra TimesCrime News : बॅनर फाडल्यावरुन किरकोळ वाद, बेदम मारहाणीत 17 वर्षीय तरुणाला संपवलं; सणासुदीत आई-वडिलांचा हंबरडा

    दरम्यान, अक्षयची हत्या झाल्याचं पोलिसांकडून निष्पन्न करण्यात आलं आहे. अक्षयच्या कुटुंबाला हे मान्य नाही. तो अक्षय नागलकरच होता हे त्याच्या कुटुंबाला मान्य नाही. त्यामुळे या प्रकरणाची उच्च तपासणी करण्याची मागणी अक्षयच्या कुटुंबाने केली आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा